बारामती(वार्ताहर): नुकतीच बारामती लोकसभा निवडणूक पार पडली. ही पंचवार्षिक निवडणूक रंगत ठरली. काहींनी निवडणूकीत छाती ठोपणे सांगितले बारामती नटवली खास, चव्हाण इको पार्क जळोचीचा अजुनही रस्ता नाही राव, कुठे गेला विकास असे म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.
चव्हाण इको पार्क भव्य दिव्य प्रकल्प उभारून दहा वर्ष पूर्ण होत आले. तरी सुद्धा येथील रस्ता होत नसेल तर बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील ही परिस्थिती असेल तर वाढीव हद्दीचा आलेला निधी गेला कुठे? हा खरा प्रश्र्न उपस्थित होत आहे.
गेली चार वर्षापासुन भारतीय युवा पँथरचे पुणे जिल्हा अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांनी रस्त्याचे खडीकरण, मुरूमीकरण करून डांबरीकरण करण्याची लेखी स्वरूपात मागणी करीत आले आहेत. परंतु, त्यांच्या व स्थानिक नागरीकांच्या मागणीला बारामती नगरपरिषद बगल देत आली आहे.
ज्याठिकाणी लोकवस्ती नाही त्याठिकाणी पथदिवे, ड्रेनेज, डांबरीकरण करून ठेवले आहेत. कारण तेथील प्लॉट विक्रीतून कोणाला खरा मलिदा जाणार आहे हे पाहणे गरजेचे आहे. चव्हाण इको पार्क येथील रस्ता केल्यास येथे मलिदा कोण देणार नाही त्यामुळे रस्ता रखडला आहे का? असेही येथील नागरीकांची मनोधारणा झालेली आहे.
बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरीक मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. भरमसाठ घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर नागरीकांकडून वसुल केले जातात. ते दिले नाही तर त्यावर शास्ती कर लादला जात आहे. या सर्व कराच्या बोजाने नागरीक मेटाकुटीस आलेला आहे त्यामुळे मोघलांनी लादलेला जिझिया कर बरा होता पण नगरपरिषेदचा कर नको असे म्हणण्याची वेळ आली आहे.
नगरपरिषदे कर आकारते मात्र, मुलभूत गरजांपासून नागरीकांना वंचित ठेवत आहे. त्यामुळे येणार्या काही दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास भारतीय युवा पँथरच्या वतीने बारामती नगरपरिषदेसमोर आंदोलन छेडण्यात येईल असेही शेख यांनी बोलताना सांगितले.