बारामती(वार्ताहर): येथे आयोजित गौरी आरास स्पर्धेत चांद्रयान मोहिमेचा देखावा करीत खटाव सिद्धेश्र्वर कुरवलीच्या कु.अमृता तंटक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
रागिणी फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरी गणपती सणानिमित्त गौरी आरास स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी देखील रागिणी फाऊंडेशन व लीनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- अमृता तंटक सिद्धेश्वर कुरोली, खटाव (प्रथम), प्राची गोडसे, बारामती(द्वितीय), श्वेताली भिले, डोर्लेवाडी (तृतीय), स्वाती सस्ते, माळेगाव व काजल घोलप सोमेश्वरनगर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. विशेष आकर्षणासाठी बारामतीच्या सोनम गाडे, वैशाली टाळकुटे, तर सोमेश्र्वरच्या सोनाली गायकवाड, माळेगावच्या वर्षा थोरात, सोनगावच्या अंबिका माने यांना पारितोषिके देण्यात आली.
अध्यात्मिक परंपरेबरोबरच महिलांच्या कलाकृतीला जास्तीत जास्त वाव मिळावा, त्यांच्या कलाकृतीतून समाज प्रबोधनात्मक विचार मिळावा. यादृष्टीने गौरी आरा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे रागिणी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष राजश्री आगम यांनी सांगितले. दिवसेंदिवस आपल्या गौरी आरास मधून विविध प्रबोधनात्मक आरास केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण पूरक संकल्पना घेऊन गौरी आरास व समाज प्रबोधनपर संदेश असा स्पर्धेचा निकष होता. या निकषान्वये स्पर्धकांनी वेगवेगळ्या संकल्पना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून राबवल्या होत्या. या स्पर्धेत 40 स्पर्धक सहभागी झाले होते.
यावर्षी महिलांनी चांद्रयान मोहीम, जैविक शेती, पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व, स्त्री कर्तृत्वाचा जागर, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा, जेजुरी गड अशा वैविध्यपूर्ण आरास केल्या होत्या.
या स्पर्धेसाठी राधिका साडी सेंटर आणि एल मी सलोन यांचे प्रायोजकत्व लाभले. तरी या कार्यक्रमासाठी रागिणी फाऊंडेशनच्या सदस्य ऋतुजा आगम, घनश्याम केळकर, साक्षी आंबेकर, पूजा बोराटे, सुजाता लोंढे, लीनेस राधिका घोळवे, लिनेस उज्वला शिंदे यांचे योगदान लाभले. हा कार्यक्रम मल्हार क्लब येथे संपन्न झाला.