बारामती(प्रतिनिधी): खासगी कारखानदारांनी स्वतःला कितीही सहकाराचे पुरस्कर्ते आम्ही आहोत, असे म्हणून घेतले तरीही सभासद त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे सभासद राजा जागा हो, सहकाराचा धागा हो,“ असे आवाहन सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांनी केलेल्या टिकेला कुरणेवाडी, बारवनगर येथे प्रचार सभेत आरोपांचे खंडण केले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या 45 वर्षांत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी सहकारातून शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व सर्वांगिण विकास केला. त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ सभासद नक्की देतील असेही ते म्हणाले.
कारखान्याचे विस्तारीकरण, डिस्टलरी प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, शिवतीर्थ मंगल कार्यालय, शिक्षण संस्था उभारण्यासाठी अण्णांचे मोठे योगदान दिले आहे. 50 वर्षांत पवार कुटुंबीयांना बारामतीकरांनी लोकसभा, विधानसभा यासह सर्वकाही दिले. तरीही त्यांना शेतकऱ्यांचा माळेगाव कारखाना पाहिजे. हे सभासद कदापीही खपून घेणार नाहीत. असे काही सभासद बोलताना दिसत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूकीत अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हरलो होतो, आता त्याची पूर्णतः खबरदारी घेतली असल्याचेही तावरे यांनी सांगितले.
कारखान्याची निवडणूक पवारांनी प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. ही निवडणूक शेतकरी, सभासदांच्या प्रपंचाची व मुला बाळांच्या भवितव्याची आहे. त्यासाठी यांच्या विरोधात लढताना एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा कारखाना सत्ताधाऱ्यांच्या हातात गेला, तर शेजारची पुन्हा 11 गावे जोडण्याचा घाट हीच मंडळी घालतील. सत्तापरिवर्तन करण्यासाठी सहकार बचाव पॅनेलच्या किटली या चिन्हावर मतदान करण्याची विनंती करीत आहे,“ असे तावरे यांनी सांगितले.