बारामती(प्रतिनिधी): श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. माळेगावात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली नाही यावरून सभासद संभ्रमात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तळ्यात की मळ्यात अशा चर्चेला उधान आले आहे.
19 हजार 600 सभासद असणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चौरंगी लढत होणार आहे. छत्रपती कारखान्यात शरद पवार गटाने घेतलेला यु-टर्नबाबत सभासदांमध्ये तर्क विर्तक चर्चेला उधान आले होते. काही सभासदांच्या मते सर्व पॅनेल पडला असता मात्र, विरोधात उमेदवार तरी उभे केले पाहिजे होते. माळेगाव कारखाना निवडणूकीत अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी न दिल्याने शरद पवार गट मतदारांची चेष्टा करीत आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे. माळेगाव कारखान्यामध्ये ठाम भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीलकंठेश्वर पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात लढत होणार आहे.
अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलने 21 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये ब गटातून अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्निल जगताप, प्रताप आटोळे, नितीन सातव, संगीता कोकरे यांना उमेदवारी दिली आहे.
विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप, मदन देवकाते, अनिल तावरे, सुरेश खलाटे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणूकीत एकनिष्ठेने काम करणाऱ्यांना उमेदवारी दिली म्हटले जात आहे. उमेदवारी न देता एमआयडीसी किंवा पुणे इ. ठिकाणी मोठे टेंडर दिले असते तरी कृतज्ञता व्यक्त झाली असती. मोठ-मोठी टेंडर दुसरीकडे आणि कारखान्याची उमेदवारी एकनिष्ठ वाल्यांना अशीही चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे.
‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’ने विद्यमान संचालक गुलाब गावडे, उपाध्यक्ष रमेश गोफणे यांच्यासह युवा सभासदांना उमेदवारी दिली आहे.