इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मागण्या व प्रश्र्न शासन दरबारी निश्चितपणे सोडवून रक्षाबंधनाची ओवाळणी देणार असल्याचे आश्र्वासन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या भगिनींनी इंदापूर येथे राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी शेकडो अंगणवाडी सेविका व मदतीस भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युएटी मिळावी, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वाढवून मिळावे, बालकांना देण्यात येणार्या पूरक पोषण आहारात रक्कमेंत वाढ करणे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन दरबारी सहकार्य करावे, अशी विनंती अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे, पुणे जिल्हा उपाध्यक्षा पुनमताई निंबाळकर, बिलकिश काझी, तनया जाधव, सीमा खामगळ, तुळसा जाधव, शुभांगी शिंदे, उषाकिरण सावंत, सुनीता माळवदकर, संगीता रणवरे, सुवर्णा कुलकर्णी, वर्षा गाढवे, सविता मखर, सविता रायकर, सोनाली पावडे , हडपसर शहर अध्यक्षा नीता पायगुडे व मोठया संख्येने सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
राज्याचे महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री असताना आपण राज्यामध्ये सुमारे 1 लाख अंगणवाड्या एका सहीने मंजुर केल्या, त्यामुळे सध्या हजारो भगिनी ह्या अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून काम करीत आहेत, असे यावेळी राज्य अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकार्यांनी नमूद केले.