बारामती(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे ज्या तालुक्यातून भरघोस मताधिक्याने विधानसभा मतदार संघातून निवडून आले त्याच मतदार संघात कारखान्याच्या निवडणूकीत ब-वर्गातून बिनविरोध होण्यापेक्षा त्यांना लढावे लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आण्णा-काकाचा सहकार बचाव पॅनेलच जिंकला असे मतदारांमध्ये बोलले जात आहे.
माळेगाव कारखान्यावर गेली पाच वर्षे ना.अजित पवार यांची सत्ता असताना सुद्धा निवडणूक कालावधीत उपमुख्यमंत्र्यांना 15 दिवस तळ ठोकून बसावे लागत असेल, मतदारांशी संपर्क साधावा लागत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तालुक्यातील पदाधिकारी व संचालक मंडळाने काय केले यावर खरा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सभासदांना लक्ष्मी दर्शन करावे लागले. यामुळे मतामध्ये परिवर्तन झाले. माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत अजितदादा नसते तर…आज काय परिस्थिती झाली असती. याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विशेषतः मागील संचालक मंडळ करणार आहेत का नाही.

मागील संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मी चेअरमन होणार, माझ्या गटाचा चेअरमन होणार, माझाच टर्म आहे चेअरमन होण्याचा अशी दिवास्वप्ने पाहु लागली होती. ना.अजित पवार यांनी मीच चेअरमन होणार हे भरसभेत सांगताच या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.
आज जरी सर्वच्या सर्व उमेदवार ना.अजित पवार यांचे निवडून आले तरी सहकार बचाव पॅनेलच जिंकला असे म्हणणे वावगे ठरू नये. राज्याचे उपमुख्यमंत्री पासून ते तालुक्यातील प्रत्येक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असताना सुद्धा माळेगाव कारखान्यासाठी एवढा उठाठेव करावी लागत असेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपलेसे करण्यासाठी मोठ-मोठी आश्वासने द्यावी लागत असेल तर पुढील काळात सभासदांचा असाच विश्वास संपादन करणार का? अन्यथा प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत लोकशाहीचा गळा आवळणार व सभासदांना लक्ष्मी दर्शन करणार हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.
तत्कालीन संचालक मंडळाने सर्वाधिक म्हणजे 3636 रूपये ऊसाला भाव देऊनही सभासदांना पंचवार्षिक निवडणूकीत लक्ष्मी दर्शन करावे लागत असेल तर कुठं चुकत आहे याचे आत्मपरिक्षण राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार त्यांच्या पक्षाला व पक्षातील पदाधिकाऱ्यांना करण्याची गरज आहे.