मुंबई: सन 1977 साली आम्ही सरकार बनविले. त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होती मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवले होते असे देवेंद्र फडणवीसांनी बिनबुडाच्या आरोपावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांनी पत्रकारांसमोर प्रतिउत्तर दिले.
चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी देवेंद्र फडणवीस खा.शरदचंद्रजी पवारांना म्हणाले की, 1978 साली शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षं चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षं चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? असे कसे चालेल? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.
प्रतिउत्तर देताना पवार साहेब म्हणाले की, मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावे. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते. मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतले जाते अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावरूनही पवारांनी त्यांच्यावर टीका केली. हेही फडणवीसांचं अज्ञानच आहे. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर पिचड होते. सुनील तटकरे होते. हे सगळे कोण आहेत? ही सगळी यादी बघा. अर्थात त्यांचे वाचन किती आहे ते मला माहिती नाही. या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता ते विधाने करतात. ठीक आहे, लोकांना माहिती असते. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरून नाही, असेही ते म्हणाले.