भाजप देवीदेवतांचा वापर करते निवडणुकीत नंतर त्यांचा अपमान – नाना पटोले

सांगली: भाजप आपल्या देवीदेवतांचा वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करीत असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार 2024 शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. याअपमान करत आहे. वेळी श्री.पटोले बोलत होते.

पुढे पटोले म्हणाले की, कर्नाटकात भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपूरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा, जनतेचा अपमान करीत आहे. तसेच पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये कॉंग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपच्या राज्यात मात्र नोकर्‍या संपवण्यात आले, आरक्षण संपवले. धनगर समाजाला 2019 मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन कॉंग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही कॉंग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे नाना पटोले यांनी नमूद केले.

जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करणारा भाजप पक्ष – कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या

जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करणारा भारतीय जनता पक्ष असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात 40 टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व कॉंग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर दिनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, त्याला समान हक्क मिळाले नसते. जातीयवादी भाजपा सरकार मात्र घटनाच बदलण्याची भाषा करत आहे. गोलवलकर, सावरकर यांनी संविधान अस्तित्वात आल्यापासूनच विरोध केला आहे आणि आताही या विचाराचे लोक संविधानाला विरोधच करत आहेत. संविधान राहिले तरच आपले अस्तित्व राहिल म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग व बलिदान देण्याची तयारी ठेवा, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने 224 पैकी 136 जागांवर विजयी मिळवला. कर्नाटकात भाजप जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत येत नाही, ते ऑपरेशन कमळ करुन आमदार विकत घेऊन सत्तेत आले होते. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते. कॉंग्रेसने कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार घराघरात पोहचवला व भाजपमुक्त कर्नाटक केले. सरकार स्थापन होताच जनतेल्या दिलेल्या 5 आश्वासनांवर 24 तासात निर्णय घेतला, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, आ. प्रणिती शिंदे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!