अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूरच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे. या निवडणूकीच्या निकालातून भाजपचे इंदापूर तालुक्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींपैकी 19 ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्राप्त केले आहे. या 19 ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रा.पं. सदस्यांसह उर्वरित ग्रामपंचायतीमधीलही भाजपच्या निवडून आलेल्या ग्रा. पं.सदस्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनमध्ये करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन करत होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात आपली सत्ता असल्याने आगामी काळात विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार जाणार नाही. नूतन सरपंच व भाजपच्या पदाधिकार्यांनी सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वावरील राज्य सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी शेकडो योजना राबवित आहे. या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभावीपणे करावे असेही ते म्हणाले.
राज्यात शिवसेना-भाजप सरकार आल्यानंतर तालुक्यात अनेक गावांमध्ये हर घर स्वच्छ पेजल योजनांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली आहे. इंदापूर तालुक्यातील जनतेने नेहमी निवडणुकीत जनशक्तीच्या बाजूने पाठिंबा दिला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने अहोरात्र विजयासाठी परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच भाजपला भरभरून मतदान केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. आगामी काळात येणार्या सर्वच निवडणुका ताकदीने लढवून भाजप जिंकेल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले.
प्रस्ताविक इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ऍड.शरद जामदार यांनी केले. यावेळी पृथ्वीराज जाचक, ऍड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, मारुती वणवे, डॉ. लक्ष्मण आसबे, नूतन सरपंच मयूरी जामदार आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.