अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये धनगर समाजाला र चा ढ आणि ढ चा र ची दुरूस्ती करून आरक्षण दिले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार आजही धनगर समाजाला आश्र्वासनाची खैरात देवून तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असल्याचा आरोप डॉ.शशिकांत तरंगे यांनी केला.
धनगर आरक्षण ऐक्य परिषदेच्या वतीने इंदापूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली याप्रसंगी डॉ.तरंगे बोलत होते.
यावेळी दिलीप पाटील, संजय रुपनवर, आप्पा माने, सिताराम जानकर, पुंडलिक कचरे, विष्णू पाटील, बापूराव पाटील, लक्ष्मण देवकाते, विशाल मारकड, तुकाराम करे, नानासाहेब खरात इ. मान्यवर उपस्थित होते.
डॉ.तरंगे पुढे म्हणाले की, जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला धनगर समाज मते देणार नाही. धनगर समाजाला गेली 70 वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. आजपर्यंत कित्येक राजकीय पक्ष सत्तेत आली परंतु त्यांनी धनगर समाजाला अद्यापही आरक्षण दिले नाही.
बारामती या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार होते. त्यांनी देखील दिलेला आरक्षणाचा शब्द पाळला नाही. आत्ताचे सरकार देखील धनगर आरक्षणावरती बोलण्यास तयार नाही किंवा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही असेही ते म्हणाले.
निवडणुका आल्या की आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ असे सांगून सर्वच पक्ष फक्त धनगर समाजाची मते घेऊन सत्तेत येतात परंतु आरक्षण देत नाहीत. त्यामुळे आत्ताची होणारी लढाई ही आरपारची होणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आंदोलनाची सुरुवात इंदापूर पासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये करणार आहोत. अशी माहिती डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली. यावेळी धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.