इंदापूर(प्रतिनिधी): जंक्शन ग्रामपंचाय निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर काही मंडळी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदारांनी कोणत्याही भूलथापा व धमक्यांना न घाबरता निर्भिडपणे लोकशाहीला मतदान करावे असे नंदकेश्र्वर ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते संभाजी बनसोडे यांनी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मतदारांना तुम्ही कोणाला मतदान करता हे कळते असे सांगून मतदारांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. मात्र, असे कधीही होत नाही कारण आपल्या भारतात लोकशाही आहे हुकूमशाही नव्हे.
मत दिले नाही तर तुमचा रस्ता अडवेन, ग्रामपंचायतीला सांगून पाणी देणार नाही असे वक्तव्य करून मतदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुज्ञ मतदारांना मी आवाहन करेन की, तुम्ही फक्त आपले अमूल्य मत नंदकेश्र्वर ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांना द्या मी तुमच्या दारापर्यंत रस्ते व फिल्टर पाणी देण्यासाठी प्रयत्न करेन असेही त्यांनी मतदारांना आश्र्वासन दिले आहे.
भारतात लोकशाही आहे. संविधानाने सर्वांना हक्क व अधिकार दिलेले आहेत. तरी सुद्धा काही मंडळी डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा पावलो पावली अपमान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी निवडून नाही आलो तर तुला सुट्टी देणार नाही असे काही मंडळी गोर-गरीब मतदारांना धमकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मतदान बुथवर दादागिरी केली जाते असे काही मतदारांनी भेटून आम्हाला सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस व प्रशासनावर आमच्या नंदकेश्र्वर पॅनेलचा पूर्ण विश्र्वास आहे. त्यामुळे जी दादागिरी होते ती पोलीसांच्या फौजफाट्यासमोर होणार नाही असेही ते म्हणाले.
काही दादागिरी करणारे मतदारांना देवदेवतांचे फोटो व महापुरूषांच्या फोटोवर हात ठेवण्यास भाग पाडीत आहेत. सुज्ञ मतदारांना मी सांगू इच्छितो की, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार असे कृत्य करण्यास निर्बंध लावलेले आहेत असे कुठे घडत असेल तर मतदार व नागरीकांनी मला संपर्क करावा त्या घटनेचा व कृत्यावर त्वरीत आळा बसविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.