अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): 5 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर संपूर्ण देश पातळीवर ओबीसी समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने या होणार्या धरणे आंदोलन संदर्भात इंदापूर तहसिलचे नायब तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात दहा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. येणार्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करणे, नॉन क्रिमीलेयरचे अट रद्द करणे, 50 टक्के सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्यायव्यवस्था केंद्रीय सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, शेतीच्या धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे महागाई थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे संपूर्णपणे शिक्षण सक्तीचे व मोफत करणे, पूर्ण देशांमध्ये मोफत आरोग्य सुविधा पुरवणे या मागण्यांकरिता राष्ट्रीय समाज पक्षाने आंदोलन पुकारले आहे.
सदरचे निवेदन इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, नवनाथ कोळेकर, अतुल शिंगाडे, अशोक कोळेकर, सोन्या जानकर इ. दिले.
यावेळी किरण गोफणे बोलताना म्हणाले की, भारतातील कष्टकरी ओबीसी समाजाचे जात निहाय जनगणना झाल्याशिवाय या समाजाचे खरे आकडेवारी समोर येणार नाही व त्याशिवाय ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्याकरिता निधीची तरतूद करता येत नाही. त्यामुळे ओबीसींचे जात निहाय जनगणना व्हावी असे आग्रही मागणी देशभरातून राष्ट्रीय समाज पक्ष दिल्ली येथे करणार आहे व त्याला समर्थन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून रासपचे शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.