अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): परंपरेनुसार जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम सर्व सोयीयुक्त असणारे श्री नारायणदास रामदास हायस्कूल सोडून सुविधा नसणार्या आयटीआय मैदानात मुक्कामासाठी राज्यमंत्र्यांचा हट्ट का? परंपरा खंडित करू नका असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील नागरिक व वारकर्यांमध्ये याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. पालखी मुक्कामाच्या स्थळात बदल झाल्यास वारकर्यांची मोठी गैरसोय होणार असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्यांमध्ये देखील वाढ होणार आहे.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथे सर्व वारकरी यांच्यासाठी मोठी व्यवस्था असते. येथे भव्य असे प्रांगण, वर्ग खोल्या आणि निवार्यासाठी मैदान तसेच पाणी, लाईट यासारख्या सुविधा मुबलक असताना देखील केवळ राज्यमंत्र्यांच्या हट्टापायी आयटीआय या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा नसताना पालखी मुक्काम हलवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे तसेच जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर शहरात मध्यवर्ती भागातून येत असताना भक्तीभावाचा व आनंदाचा उत्सव निर्माण झालेला असतो तोदेखील या कारणामुळे निर्माण होणार नसल्याने ते वेदनादायी ठरणार आहे. पालखी इंदापूर शहरामध्ये आली नाही तर छोटे व्यापारी आणि व्यावसायिक दुकानदार यांचे नुकसान होईल.
सर्व वारकरी, स्थानिक नागरिकांची मनोमय भावना पालखी मुक्काम परंपरेनुसार श्री. नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणीच राहावा अशीच असून प्रशासकीय यंत्रणेने लोकांच्या या भावनेचा विचार करून पालखी मुक्कामाच्या स्थळामध्ये बदल करू नये असे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी व्यक्त केले.