बारामती(वार्ताहर): भारतात 20 कोटी मुस्लिम असून, कोणी भाऊ-बहिण जर उपाशीपोटी झोपत असेल तर तो मुस्लिम होऊच शकत नाही असे उद्गार दंगा मुक्त भारताचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव शेख सुभानअली सर यांनी काढले.
ह.मुहम्मद पैगंबर (स.) सर्वांसाठी अभियानातर्ंगत बारामती सोशल चॅरीटेबल फाऊंडेशन आयोजित बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात सामाजिक एकतेचा संदेश देणारा ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री.शेख बोलत होते.

नॅशनल न्यूज18 चे पत्रकार जमीर खान, ग्रामपंचायत लोणी भापकरचे सरपंच रविकाका भापकर, माजी सरपंच विजय बारवकर, पोलिस पाटील संजय गोलांडे, गोविंद भापकर, पत्रकार विजय गोलांडे, नवनाथ भापकर, अविनाश बनसोडे, पदम कडाळे, चेतन मोरे, बापू कडाळे, नितीन सकाटे, संदीप कडाळे, महादेव चोपड, प्रदिप गोंलाडे, भिमराव पवार, विजय यादव,सचिन भोईटे, फारुक काझी, मुबीन आत्तार, मोहसीन काझी, मुआज पठाण, फरहान पठाण, अमान पठाण इ. उपस्थित होते.

पुढे बोलताना शेख म्हणाले की, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खूप उशीर झाला. आम्ही आजपर्यंत अनेक ईद तुमच्याशिवाय, तुम्हाला सोडून साजर्या केल्या असे म्हणून सुभान अली सरांनी उपस्थित आई-बहिणींची माफी मागितली. पृथ्वीतलावरील सर्व मानव एकच आहेत, भाऊ-भाऊ आहेत. अल्लाह हा सर्व जगाचा पालनहार आहेत, फक्त मुस्लिमांचा नव्हे असे इस्लामची शिकवण आहे. मुहम्मद पैगंबर (स.) हे फक्त मुस्लिमांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी कृपावंत आहेत.
ते बोलताना पुढे म्हणाले की, बहुजन युवकांनी काही राजकीय लोकांच्या मानवता विरोधी, देशविरोधी मानसिकतेला बळी पडू नये. मानव सेवेसाठी आपण सर्व जगात आलो आहे. अशा कार्यक्रमांतून आपले सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक धोरणांबाबत मार्गदर्शन घेतले पाहिजे. बहुजनांमध्ये एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे, सांप्रदायिक सदभाव आणि सलोखा वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित युवा पिढी तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरचा कार्यक्रम बौद्ध समाज मंदिर, मातंग समाज मंदिर तसेच (धनगर वाडा) चोपडे वस्ती येथील शोषित वंचित बहुजन समाज बांधवांसोबत एकाच वेळी व ठिकाणी अनोख्या पद्धतीने समाजातील माता भगिनींना व लहान मुलांना भेटवस्तू म्हणून नवीन कपडे भेट देऊन सस्नेह शीरखुर्मा पार्टी तसेच सर्व समावेशक ईद मिलनचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून बंधुत्वाचा, प्रेमाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुनीर तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन एजाज आत्तार यांनी तर शेवटी आभार विजय बारवकर यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन बारामती सोशल चॅरीटेबल फाऊंडेशनचे मार्गदर्शक तसेच शाहू, फुले, आंबेडकर अभ्यासक व तांबोळी जमातीचे बारामती शहरचे अध्यक्ष मुनीर तांबोळी, बारामती सोशल चरीटेबल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जहीर पठाण, एजाज आत्तार, सचिन भोईटे, फारुक काझी, मुबीन आत्तार, मोहसीन काझी, मुआज पठाण, फरहान पठाण, अमान पठाण यांनी केले होते. या सर्वांचा लोणीभापकर ग्रामस्थांच्यावतीने गावचे सरपंच रविकाका भापकर यांनी सत्कार केला.
असे सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे कार्यक्रम, अभियान वेळोवेळी प्रत्येक समाजात साजरे व्हावे असे कौतुकास्पद उदगार मौजे लोणी भापकर गावातील ग्रामस्थांकडून मनोगत व्यक्त करताना सांगण्यात आले.
काय आहे, ह.मुहम्मद पैगंबर (स.) सर्वांसाठी अभियान…
बारामती सोशल चरीटेबल फाऊंडेशनतर्फे शेख सुभान अली सरांच्या संकल्पनेतून ह.मुहम्मद पैगंबर (स.) सर्वांसाठी अभियानातर्ंगत महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित बांधव, अनाथ मुले, निराधार आणि विधवा आई-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे कुटुंब यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत. दरवर्षीच्या कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातील ग्रामस्थ तसेच आपल्या हक्काच्या जिवाभावाच्या माणसांशी स्नेह – प्रेम , बंधुभाव निर्माण व्हावा तसेच सामाजिक ऐक्य, सदभावना वाढीस लागावी. सांप्रदायिक सदभाव आणि सलोखा वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित युवा पिढी तयार करणे, सण उत्सव साजरे करताना समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेऊन संवाद व्हावा आणि वैचारिक बांधिलकी आणि समाजात जिव्हाळा निर्माण होऊन सबंध मानवतेला प्रेमाची आपलेपणाची प्रेरणा मिळावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.