बारामती(वार्ताहर): सामाजिक सखोला अबाधित राहण्यासाठी रमजान ईद, अक्षय तृतीया भोंग्याच्या वादाच्या पार्श्र्वभूमीवर बारामती शहर पोलीस सतर्क झाले असल्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
पोलीस दल सतर्क राहण्यासाठी आलेल्या आदेशाचे पालन करीत बारामती शहरात पोलिसांचे संचलन करण्यात आले. बारामतीत सामाजिक सलोखा चांगला असला तरी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मिश्र वस्तीतून पोलिसांनी संचालन केले.
एखाद्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी पोलीस तत्पर असावेत. आणीबाणीच्या काळात करावयाच्या कारवाईची उजळणी घेण्यात आली. तसेच पोलिसांसाठी जमाव पांगवण्याचे प्रशिक्षण व उजळणी टी.सी. कॉलेजच्या मैदानावर घेण्यात आली.
यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले आठ अधिकारी 25 पोलीस कर्मचारी आर.सी.पी. दोन पथक होमगार्डचे 11 जवान यांनी संचलनात भाग घेतला.
बारामती मध्ये कोणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.