अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती इंदापूर येथे आज कामकाज आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस गटविकास अधिकारी विजय कुमार परीट, अभिजित तंबिले. प्रताप पाटील, वरकुटे खुर्दचे सरपंच बापुराव शेंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे बैठकीत म्हणाले, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी गावाचा विकासकामाचा चांगला आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्या आराखड्यातील कामासाठी शासनाच्या विविध योजनेतून, विविध विभागातून निधीची उपलब्धता करून घेण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील जनतेला त्याचा लाभ मिळावा यासाठी चांगल्याप्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील सर्व विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ही कामे कशी करता येतील तसेच पाच हजार लोकसंख्या पेक्षा जास्त असणाऱ्या गावांना नागरी सुविधामधून कामे कशी करता येतील याचा अभ्यास सरपंचांनी करणे आणि विकासकामांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आदर्श सरपंच, ग्रामसेवक तसेच गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.