न्यायालयीन व लोकशाही मार्गाने लढा देवून, शेतीचे होणारे वाळवंट रोखू व कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): न्यायालयीन व लोशाही मार्गाने लढा देवून शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील होणार्‍या शेतीचे वाळवंट रोखू व कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील सराटी, कचरवाडी (भगतवाडी), निरनिमगाव, पिठेवाडी, लाखेवाडी, वकीलवस्ती, भोडणी, बावडा या 8 गावांमध्ये शुक्रवार दि.4 मार्च 2022 रोजी शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या ठीकठिकाणी झालेल्या संवाद यात्रांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. या संवाद यात्रांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाने शेटफळ तलावातून लाभक्षेत्रा बाहेरील 65 शेतकर्‍यांना उचल पाणी परवाने बेकायदेशीरपणे दिल्याने 100 वर्षापासून पाणी मिळत असलेल्या लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेती पूर्णपणे धोक्यात येणार आहे. राजकीय दबावापोटी जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा असेही ते म्हणाले.

मंत्रालयातून हे उचल पाणी परवाने देण्यासाठी जलसंपदाच्या अधिकार्‍यांना कोणी प्रयत्न केले हे सुज्ञ जनतेला सांगण्याची गरज नाही. शेटफळ तलावामुळे बावडा परिसरातील 10 गावांमधील शेतीला पाणी मिळून हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र राज्यकर्त्यांनी नियम धाब्यावर बसवून तलावाच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांमधील शेतकर्‍यांना बेकायदेशीरपणे उचल पाणी परवाने दिले आहेत. फक्त 2 शेतकर्‍यांचे पाणी परवाने कायदेशीर असुन इतर 65 परवाने बेकायदेशीर आहेत. या चुकीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

सध्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम वेगात सुरू आहे. वीजेअभावी शेतातील उभी पिके जळून जात असल्याने, शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राज्य शासनामध्ये मंत्री आहेत. मात्र ते शेतकर्‍यांच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात गप्प आहेत, एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.

अप्पासाहेब जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तलावातून पाणी उपसा परवाने नियमबाह्य दिल्याने लाभक्षेत्रातील शेती पूर्णपणे धोक्यात आली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील दहा गावांमधील शेती उद्ध्वस्त होणार आहेत. जलसंपदाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकर्‍यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाने उचल पाणी परवाने देण्याचा बेकायदेशीर घेतलेला निर्णय मागे घेण्यास जलसंपदा विभागास भाग पाडू, असे या संवाद यात्रांमध्ये बोलताना अप्पासाहेब जगदाळे यांनी नमूद केले.

या संवाद यात्रांमध्ये शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे प्रा.पंडितराव पाटील, महादेव घाडगे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, सुरेश मेहेर, मनोज पाटील, प्रतापराव पाटील आदींसह गावोगावचे सरपंच, पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, या बेकायदेशीर उचल पाणी परवान्या विरोधात 10 गावातील शेतकरी आक्रमक झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!