बारामती(वार्ताहर): स्वातंत्र्यास 75 वर्ष पुर्ण होत असल्याने 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरीकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचा समारोप समारंभ रविवार दि.28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. कविवर्य मोरोपंत नाट्यगृह, बारामती याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या समारोप समारंभास मुंबई उच्च न्यायालयाचे व पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश उपस्थित राहणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.टी.भालेराव व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी माहिती दिली.
यावेळी वकील संघटनेच्या उपाध्यक्ष ऍड.स्नेहा भापकर, ऍड.एस.एन.बापू जगताप, ऍड.अजित बनसोडे, ऍड.राजेंद्र काळे, ऍड. बाळासाहेब शिंगाडे, ऍड.अमर महाडीक, ऍड. धैर्यशील जगताप, ऍड.रमेश कोकरे, ऍड.धीरज लालबिगे, ऍड.कमलाकर नवले, ऍड.सुनील वसेकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बारामती येथील वकील वर्ग सतत क्रियाशील आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत, यानिमित्त संपूर्ण देशामध्ये आजादी का सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त विधी सेवा समिती, बारामती व बारामती वकील संघटना, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक दिवस कायदे विषयक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये समाजातील शेवटच्या घटकाला कायद्याची माहिती व्हावी नागरिकांना आपले हक्क व अधिकार समजावेत कायद्याबद्दलची भीती न वाटता कायद्याचा वापर कसा करावा याबाबत समाजातील शेवटच्या घटका पर्यंत जाऊन विविध कायद्यांची माहिती देण्याकरिता कायदेविषय शिबिरे आयोजित केली गेली. महिलांवरील अत्याचाराबाबत महिलांच्या बाजूने असणार्या कायद्यांची माहिती महिलांना व्हावी या करिता तीन हत्ती चौक, इंदापूर चौक व विद्यानगरी चौक या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या पथनाट्याच्या सादरीकरनावेळी देखील न्यायाधीश मंडळी स्वतः रस्त्यावर उतरून जनजागृती करताना पहावयास मिळाली.
यावेळी ऍड.अमर महाडीक यांनी सविस्तर प्रस्तावना केली. यावेळी विविध वकीलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ऍड.राजेंद्र काळे म्हणाले, सर्वसामान्य नागरीक सुविधांपासून वंचित आहे त्या लोकांना न्याय हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत हा उपक्रम संपूर्ण देशात राबविला गेला आहे.
ऍड.धीरज लालबिगे म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून बार आणि बँच यांनी एकत्रीत येऊन काम केले आहे. न्यायालय आपल्या दारी, पथनाट्याच्या माध्यमातून शेवटच्या स्तरापर्यंत कायदा पोहचविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशात हा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. सर्वांपेक्षा पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त कार्यक्रम झाले त्यामध्ये बारामतीत जास्त झाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम शेवटच्या स्तरापर्यंत पोहचवा असे सर्वोच्च न्याालयाचे आदेशाप्रमाणे, न्यायाधीश या उपक्रमात आपल्या खांद्याला खांदा लावून पुढे आले ही खूप मोठी बाब आहे. या सांगता समारंभास शासकीय सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा असे ऍड.स्नेहा भापकर यांनी सांगितले.
ऍड.रमेश कोकरे म्हणाले की, बारामतीत बेंच आणि बारने मिळून विविध कार्यक्रम केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमातून शेवटच्या नागरीकांपर्यंत न्याय मिळावा हा उद्देश होता. सुट्टीच्या दिवशी सुद्धा न्यायाधीय, वकील येतात आणि तंटा मिटवतात हे खूप महत्वाचे आहे.
ऍड.चंद्रकांत सोकटे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली. सुप्रिम कोर्ट व हायकोर्ट च्या विद्यमाने व विधी सेवा समितीच्या विद्यमाने कायदा शेवटपर्यंत पोहचविण्याचे काम केले. बारामतीत विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये न्यायाधीश व वकील संघटनेने वेळोवेळी सहकार्य केले. सांगता समारंभा वेळी शासनाच्या विविध सेवा व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत त्याचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.
यादिवशी सेवा व सुविधा तात्काळ मिळणार
विधी सेवा समिती मार्फत गरजू लोकांसाठी असणार्या विविध योजना त्याची माहिती, मा.सर्वोच न्यायालय व मा. उच्चन्यायालयाच्या निर्देशांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणार आहे. कविवर्य मोरोपंत नाट्यगृहा बाहेरील पटांगणामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे स्टॉल सर्वसामान्य नागरिकांकरीता लावले जाणार आहेत. या स्टॉलवर नागरिकांना शासनाकडे दैनंदिन गरजेकरीता लागणार्या सुविधा जसे की आधार कार्ड, वाहन परवाना, 7/12 उतारा, निराधार योजनेची प्रकरणे, जिल्हा परिषदे मार्फत शेतकर्यांना दिल्या जाणार्या विविध योजनांची माहिती व वाटप, शासकीय कामकाजामध्ये येणार्या अडचणी संदर्भात तसेच कायदेशीर कामकाजामध्ये येणार्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.