मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र, एका महिन्यापूर्वीच मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून 31 ऑगस्ट रोजी मनसेची विश्र्वकर्मा दहिहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार केला होता.
करोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितले.
दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितलं असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं.
एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसं ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केलं आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचं आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असं समन्वय समितीने सांगितलं आहे.
एकीकडे ही बैठक होत असतानाच दुसरीकडे एका महिन्यापूर्वीच मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि तिसर्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्र असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मनसेप्रमाणेच घाटकोपर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राम कदम यांनीही यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय.