राज्यातील सर्व दैनिके व साप्ताहिकांचे जाहिरात दर वाढले; प्रिंट मीडियाला आघाडी सरकारचा दिलासा

बारामती(वार्ताहर): गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट मीडिया मोठ्या आर्थिक  अडचणीत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील दैनिके, साप्ताहिकांची जाहिरात दरवाढ करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य वृतपत्र संपादक सहकारी संघ, असोसिएशन स्मॉल न्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या आणि संपादक पत्रकार सेवा संघासह इतर संघटनांच्या वतीने सातत्याने राज्य शासनस्तरावर प्रयत्न केला जात होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांना  13 ऑगस्ट 2020 पासून दरवाढ व श्रेणीवाढ दिली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वृतपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ,असोसिएशन स्मॉल न्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील आणि  संपादक पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष किसनभाऊ हासे  यांनी दिली आहे.

                महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, माहिती व जनसंपर्क खात्याच्या राज्यमंत्री ना. आदिती तटकरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, त्याचबरोबर माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक, उपसंचालक, पुस्तके व प्रकाशने विभागाचे अधिकारी यांना आभाराचे पत्र देऊन राज्यातील लघु-मध्यम वृत्तपत्रांना दिलासा दिल्याबद्दल राज्यातील लघु व मध्यम वृतपत्र मालक संपादकांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत.बारामती येथील साप्ताहिकांचे संस्थापक, संपादक दत्ता महाडीक, अविनाश रणसिंग,शुभांगी महाडीक,राजेश वाघ,विजय भिसे, तैनूर शेख यांनी निर्णयकर्त्या मंत्री महोदयांचे तसेच लघु वृतपत्रांच्या हितासाठी आग्रही व प्रयत्नकर्त्या संघटना प्रमुखांचा व पदाधिका-यांचे विशेष आभार मानले.

      महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त यादीवरील 833 वृत्तपत्रांना जाहिरात दरवाढ व श्रेणीवाढ देऊन दिलासा दिला आहे. दरम्यान प्रसिद्ध होत नसलेली,अनियमित 44 वृत्तपत्रे शासनमान्य यादीवरून कमी करण्यात आली आहेत. अशा वर्तमानपत्रांना शासनमान्य यादीतून वगळण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  13 ऑगस्ट 2020  रोजी शासन आदेश पारित करून ज्या वृत्तपत्रांना दरवाढ दिली आहे. आणि ज्या वृत्तपत्रांना श्रेणीवाढ दिली आहे. त्यांचा उल्लेखित सदर आदेशांमध्ये करण्यात आलेला आहे.

         शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नवीन नियमावलीनुसार जे वर्तमानपत्र पात्र आहेत.अशा महाराष्ट्रातील दैनिके, साप्ताहिकांसह लघु व मध्यम वृत्तपत्रांनाही दरवाढ, श्रेणीवाढ देण्यात आलेली आहे. ठाकरे यांच्या आघाडी सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील प्रिंट मीडियासाठी वर नमूद केलेल्या संघटना सातत्याने वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीत असल्याने अखेर या प्रयत्नांना सकारात्मक यश आल्यामुळे अनेक संपादकांनी आनंद व्यक्त केला आहे.                   

     गेल्या काही वर्षांपासून प्रिंट मीडिया संक्रमणावस्थेतून जात असून प्रिंट मीडियाला या निर्णयामुळे उर्जितावस्था प्राप्त होईल, असा आशावादही रविंद्र बेडकीहाळ,  आप्पासाहेब पाटील व किसनभाऊ हासे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्रांची जाहिरात दरवाढ झाल्याबद्दल या जाहिरात दरवाढीमुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा मिळाला असून येणार्‍या काळांमध्ये वृत्तपत्र टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभेल असा विश्वासही संपादक वर्गातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!