भिमाकोरेगावचा प्रेरणादायी व गौरवशाली इतिहास पुसण्याचा काही समाजकंटकाचा डाव
बारामती(वार्ताहर): भिमा-कोरेगाव येथील विजय रणस्तंभावरील वादग्रस्त पाटी काढण्यासाठी गेल्या तीन वर्षापासुन पाठपुरावा करणारे बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व शेर सुहास मित्र मंडळाचे अध्यक्ष भारत झुंबर अहिवळे यांचे दि.12 डिसेंबर पासुन गेली 10 दिवस सुरू असलेले चक्री उपोषण दि.18 डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या सकारत्मक बैठकी नंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 ला जो संघर्ष झाला तो ऐतिहासिक व बहुजन समाजाच्या अस्मितेचा होता. दि.31 डिसेंबर 1817 रोजीच्या रात्री विषमतावादी व्यवस्थेच्या विरूद्धची महान लढाई झाली होती. या लढाईत शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी विजयस्तंभ उभारून या महान योद्धांना मानवंदना देण्यासाठी व त्यापासून व्यवस्थेच्या विरूद्ध लढण्याची प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी भिमा-कोरेगांव याठिकाणी संपूर्ण बहुजन समाज उपस्थित राहतो.

भिमा-कोरेगावचा प्रेरणादायी व गौरवशाली इतिहास पुसण्याचा काही समाजकंटकाचा डाव आहे. सन 1965 व 1971 च्या भारत-चीन व भारत-पाकिस्तान युद्धातील शहीद जवानांची नावे या विजय स्तंभावर घुसडण्यात आली आहेत. या शहीदांचा सार्थ अभिमान सर्वांनाच आहे. मात्र या शहीदांचे स्मारक स्वतंत्र असले पाहिजे असेही भारत अहिवळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
1 जानेवारी 2017 व 1 जानेवारी 2018 साली या लढाईच्या द्विशताब्दी वर्षपुर्ती निमित्त बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सरकारला अपिल केले होते की, सन 1965 व 1971 च्या युद्धातील शहीद झालेल्या जवानांचे स्मारक उभारण्यासाठी पैसे नसतील तर आमच्या संघटनेतर्फे स्तंभासाठी पैसा उपलब्ध करून देवू. मात्र, सदरची वार्ता जनसामान्यांत जावू नये, याचा प्रचार-प्रसार होऊ नये म्हणून 1 जानेवारी 2018 रोजी काही समाज विघातक शक्तींनी व समाजकंटकांनी दंगल घडवून आणली व मुख्य मुद्द्याला बाजुला केले.
बहुजनांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी करू असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अहिवळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पुरातत्व खात्याचे संचालक, संरक्षण मंत्रालय, पुणे येथील दक्षिण कमान कॅन्टोनमेंट व पुणे जिल्हाधिकारी, नायब तहसिलदार (गृहशाखा) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना केलेल्या पत्रव्यवहारातून असे पुढे आले की, विजयरणस्तंभावरील नावे कोणीही लावले नाही. त्यामुळे 1 जानेवारी 1818 च्या युद्धातील शूर महार सैनिकांचा अपमान करण्याच्या उद्देशाने व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व शूर बहुजनांचा इतिहास पुसण्यासाठी सैनिकांची नावे विजयस्तंभावर लावण्यात आले आहे.
या चक्री उपोषणास पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल 80 आंबेडकरप्रेमी व बहुजनप्रेमी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.
दरम्यान यावेळी भारतदादा अहिवळे यांच्या समवेत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे जेष्ठ विधिज्ञ ऍड.बी.जी.बनसोडे, भारतीय दलित कोब्राचे नेते ऍड.भाई विवेक चव्हाण, भारत मुक्ती मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन बनसोडे, दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घनश्याम भोसले,भारत मुक्ती मोर्चाचे ऍड.सुशिल अहिवळे, भिम आर्मीचे अभिजित गायकवाड, भिम ब्रिगेडचे जयदीप सकट व शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.