बारामती(प्रतिनिधी): बारामतीच्या जडणघडणीत पवार कुटुंबियांचा खुप मोठा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्व पवार कुटुंबियांचा सन्मान करणारा असावा असे नागरिकांतून बोलले जात आहे.
बारामतीच्या जडणघडणीत कै.वसंतराव पवार, कै.अप्पासाहेब पवार, कै.अनंतराव पवार या लोकांना बारामतीकर कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीचा आधुनिक व शाश्वत विकास केला. राजेंद्र पवार यांनी कृषी व महिला शिक्षण व सबलीकरण वर भर दिला. ना.अजित पवार यांनी आधुनिकतेची जोड देत सर्वच क्षेत्रात सहकार, औद्योगिक, आरोग्य, व्यापार क्षेत्राला विकास व बळ दिले.
राजेंद्र पवार यांचे सुपुत्र रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे सक्षमपणे लोकप्रतिनिधीत्व सांभाळीत आहेत. खा.सुप्रिया सुळे, खा.सुनेत्रा पवार ह्या लोकसभेमध्ये वेगळी छाप निर्माण करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक पवार कुटुंबाचा विकसीत बारामतीसाठी खूप मोठे योगदान आहे.
मध्यंतरी पवार कुटुंबात राजकीय मतभेद निर्माण झाले परंतु, मनभेद व कुटुंबभेद निर्माण झाले नाही याचे भान काही लोकांनी अधोरेखीत करणे गरजेचे होते. सध्या काही इच्छुक नगराध्यक्षांच्या रांगेत असणाऱ्यांनी या राजकीय मतभेदातून स्वार्थ साधला. काही बहाद्दरांनी स्वतःची पोळी भाजून पवार कुटुंबातील व्यक्तींचा अपमान करणे, आमचाच नेता पावरफुल असे समजून दुसऱ्या पवारांना पाण्यात पाहिले. मी नेत्याचा किती निष्ठावंत, एकनिष्ठ व त्यांच्या हाकेला धावणारा असे दाखविण्याचा प्रयत्न केला.
नेत्याशी एकनिष्ठ दाखविले लोकसभेला प्रचार कोणाचा केला. विधानसभेला पँट फाटेपर्यंत पळाले आणि आम्ही केलेल्या नियोजनामुळे नेत्यांना भरघोस मताधिक्य मिळाले असे दाखविले. आज नगराध्यक्षपदासाठी 17 लोकांनी मागणी केलेल्या उमेदवारांपैकी काहींनी पवार कुटुंबात स्वतःच्या स्वार्थासाठी मतभेद केले. या स्वार्थी इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी मागणी करणाऱ्यांनी पवार कुटुंबियांना नावं ठेवत बसले. तमाम बारामतीकरांनी या स्वार्थींना लोकसभेला व विधानसभेला दोन्ही पवार आम्हाला हवे आहेत हे दाखवून या इच्छुकांना धडा शिकविला आणि मतदान केले. तरी या स्वार्थी इच्छुक नगराध्यक्ष पदाची मागणी करणाऱ्यांचे डोळे उघडत नसतील तर याला काय म्हणायचे.
त्यामुळे बारामती नगरपरिषद पंचवार्षिक 2025 च्या निवडणूकीत सर्व पवार कुटुंबातील सदस्यांचा मान-सन्मान राखणारा, पाठीमागे त्यांना नावं न ठेवणारा बारामतीचा प्रथम नागरिक केला पाहिजे अशी नागरिकांतून मागणी आहे.