बारामती(प्रतिनिधी): एसडी पीआय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजहर बाशा तांबोळी यांनी मुंबई व पुणे याठिकाणी पत्रकार परिषदेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार झाल्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्यासह आलताफ सय्यद यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत, राजकीय स्टंट केल्याने बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी बारामतीतील संपूर्ण कर्जदारांनी केली आहे.
14 जुलै 2025 रोजी हॉटेल कृष्णसागर याठिकाणी आलताफ सय्यद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अजहर तांबोळी यांनी केलेले आरोप बिनपुराव्याचे व दिशाभूल करणारे असल्याचे कागदपत्र सादर करीत स्पष्ट केले. यावेळी परवेज सय्यद, हाजी रशिद बागवान, इम्तियाज तांबोळी, आसिफ झारी, इम्रान मोमीन, सुबहान कुरैशी महामंडळातर्फे घेतलेले कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आलताफ सय्यद यांनी प्रत्येक आरोपाचे खंडन करीत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. तांबोळी हा मूळचा सोलापूरचा सध्या पुणे कोंडवा याठिकाणी राहत आहे. त्याने पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणूकीत उमेदवाराला जे प्रतिज्ञापत्र सादर करायचे असते ते प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची सुद्धा फसवणूक केली आहे.
तांबोळी यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखल असलेल्या गुन्ह्यात फसवणूक, मारामारी, धमकी, कागदपत्रात हेराफेरी यांचा समावेश आहे. दोन पत्नी व सहा मुलांचा समावेश आहे. एका पत्नीचे पूर्ण नाव तर दुसऱ्या पत्नीचे फक्त नावाची नोंद या प्रतिज्ञापत्रात आहे.
तांबोळी यांनी सांगितले, आलताफ सय्यद हे महामंडळाचे पुणे व्यवस्थापकाचे सख्खे मामा आहे. सख्खा तर सोडा तो चुलत, चुलत सुद्धा मामा नाही. खोटं बोल रेटून बोल असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसत आहे.
तांबोळी म्हणतात 98 टक्के उन्नती कर्ज प्रकरणे बारामतीत झाले. कोणताही ठोस पुरावा नसताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचे खंडन करीत आलताफ सय्यद यांनी सांगितले, उन्नती कर्ज योजना लागू झालेपासून महाराष्ट्रातून 3 हजार 524 कर्ज मंजूर झाले. पुणे येथे 435 तर बारामतीत 388 कर्ज प्रकरणे मंजूर झाले आहेत. यावरून टक्केवारी लक्षात येते. कर्ज मंजूरी पत्र व खात्यात पैसे येईपर्यंत तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी गेलेला आहे. प्रत्येक फाईलची जुळवा-जुळव करून तपासणीसाठी प्रथमतः जिल्हा व्यवस्थापक, विभागीय नंतर महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या सहीने मंजूरी पत्र काढले जाते. कर्जदाराच्या खात्यात पैसे न येता इतरांच्या खात्यात पैसे गेले तर त्यास भ्रष्टाचार म्हटला जातो. तांबोळी एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना एवढा अज्ञानपणा कसा असेही सय्यद यांनी यावेळी सांगितले.
तांबोळी यांच्या म्हणण्यानुसार सोसायटी व बँकेत गैरव्यवहार केले. गोर-गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना आपल्या हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न साकार करण्यासाठी आलताफ सय्यद यांनी जागा घेऊन एकता गृहनिर्माण सोसायटीची स्थापना केली. जागेची मोजणी केली. तात्पुरती एन.ए.मान्यता घेऊन टाऊन प्लॅनिंग कार्यालयातून प्लॅन मंजूर केला. स्टेट बँकेचे 25 लाखाचे चलन सुद्धा भरले. क.जा.प.सुद्धा करून घेतले आहे.
महामंडळाचे पैसे मिळण्यापूर्वीच सोसायटीने जागा खरेदी केलेली आहे. त्यामुळे महामंडळाचे आलेल्या पैश्यात जागा घेतली असल्याचा आरोप चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. सदरच्या बांधकामास दि मुस्लीम को-ऑप बँकेने प्लॉट तारणावर 60 लोकांचे गृहकर्ज मंजूर केलेले आहेत. या कर्जाचे हप्ते नियमित न चुकता जात असल्याचेही सय्यद यांनी यावेळी सांगितले.
अजहर तांबोळी हे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ना.अजित पवार सह आलताफ सय्यद यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तांबोळी यांना बारामतीतून तीन व्यक्ती चुकीची माहिती देत असल्याचेही सय्यद यांनी सांगितले. या तांबोळी यांचे पुण्यात बेकायदेशीर कामे सुरू आहेत त्यावर सुद्धा यापुढे करडी नजर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महामंडळाचे प्रकरण करणे सोपे नव्हं….
आलताफ सय्यद काम करीत असलेल्या कामांना नावं ठेवणाऱ्यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची 50 प्रकरणे मंजूर करून आणावीत. कर्ज मंजूरी पत्र मिळेपर्यंत व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत काय प्रक्रीया असते याचा अंदाज येईल. किती व कसा पाठपुरावा करावा लागतो. तयार केलेल्या फाईलमध्ये महामंडळाचे अधिकारी तपासात काढीत असलेल्या त्रुटी त्या त्रुटीची दुरूस्ती या सर्व चाकोरीबद्ध प्रक्रीयेतून जावून कर्ज मंजूरी करून घ्यावी लागते. आलताफ सय्यद सारखी माणसे दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण इ. ठिकाणी तयार झाली पाहिजे. अन्यथा महामंडळाने कितीही योजना काढल्या त्या जर तुम्हाला तुमच्या गावात, शहरात, तालुक्यात व जिल्ह्यात राबविता येत नसतील तर आलताफ सय्यद यांच्याबाबत बोटं मोडण्याशिवाय, नावं ठेवण्याशिवाय पर्यायच राहणार नाही.