वतन की लकीर (ऑनलाईन): सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असताना तब्बल 420 मुस्लीम उमेदवार रिंगणात उभे आहेत तर भाजपने नेहमीप्रमाणे एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.
प्रत्येक राजकीय मंडळी मुस्लीम समाजाला जातीवादाच्या चष्म्यातून पाहत आलेले आहेत. महाराष्ट्रात इतरही समाज राहतात मात्र, 288 उमेदवारांपैकी 420 मुस्लीम उमेदवार निवडणूक लढवीत असतील तर त्यांच्या अस्मीतेला नक्कीच कुठे ना कुठे ठेस पोहचलेली आहे. याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने करण्याची गरज आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांत एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून त्यामध्ये मुस्लीमधर्मीय उमेदवारांची संख्या 420 आहे. यामध्ये अपक्ष व नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या मोठी असून महाविकास आघाडीने 11 तर महायुतीने सहा मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे मुस्लिमांना 10 टक्के उमेदवारी देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात कॉंग्रेसने 8, राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) 2 आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) 1 असे एकूण 11 (4 टक्के) उमेदवार दिले. महायुतीमध्ये शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 1 आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) 5 असे अवघे सहा (2 टक्के) मुस्लीम उमेदवार दिले आहेत. भाजपने नेहमीप्रमाणे एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.
वंचित बहुजन आघाडी 200 जागा लढवत असून 23 मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. एमआयएमने 17 पैकी 10 तर समाजवादी पक्षाने 9 पैकी 7 मुस्लीम उमेदवार दिले आहेत. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 150 आणि अपक्ष 218 मुस्लीम उमेदवार विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यामध्ये 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 17 तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व 13 उमेदवार मुस्लीम आहेत.
मुदत संपलेल्या विधानसभेत 10 मुस्लीम आमदार होते. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) इद्रीस नायकवडी हे एकमेव मुस्लीम आमदार आहेत.