बारामती(प्रतिनिधी): म्हणे विकासऽऽ..झाला आज कित्येक गावांना पाणी नाही. मात्र, बारामती शहरातील नदी सुशोभिकरणाच्या नावाखाली 155 कोटी रूपये खर्च केले असल्याची टिका ऍड.अमोल सातकर यांनी केली.
मासाळवाडी (ता.बारामती) येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप चोपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ऍड.सातकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ऍड. सातकर म्हणाले की, बारामती तालुक्यात ऊस कारखाने कोणी आणले, निरा-डावा कॅनॉल कोणी आणला तरी आज मितीस 22 गावांचा पाणी प्रश्र्न गेली कित्येक वर्ष सत्ता हाती असणार्या पवारांना सोडवता आला नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
पवार साहेब म्हणतात तरूणांना संधी द्यायची, मग पवार कुटुंबातच तरूण आहे का? इतर समाजात तरूण नाही का? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रत्येक निवडणूकीत मासाळवाडीने राष्ट्रीय समाज पक्षावर भरभरून प्रेम केले आहे. या निवडणूकी सुद्धा शिट्टी या चिन्हा समोरील बटण दाबून आपल्या हक्काचा माणूस संदीप चोपडे यांना बहुमताने निवडून द्यावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.