बारामती(वार्ताहर): पुढचे पाठ, मागचे सपाट अशी अवस्था सरकारची झालेली आहे. 70 वर्ष सहन केले, आता सहन करणार नाही, एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा देत बारामती धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सरकार व प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी आमरण उपोषण दि.9 नोव्हेंबरपासुन दुपारी 1.00 वाजता बारामती प्रशासकीय भवन समोर चंद्रकांत वाघमोडे पाटील आमरण उपोषण करणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील धनगर समाज मागील 70 वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली अनेक मोर्चे आणि उपोषणे झाली तरी सुद्धा सर्वच सत्ताधारी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. धनगर समाजाची आरक्षणाची ससेहोलपट कधी थांबणार हा खरा प्रश्र्न निर्माण झालेला आहे. जे सरकार सत्तेच्या बाहेर असते तेव्हा ते धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणते, तेच सरकार धनगर समाजाच्या मतावर सत्तेत बसले की तेव्हा ते सरकार मुग गिळून गप्प बसते. यामुळे समाजात असंतोष पसरला आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी चोंडी येथे बसलेल्या धनगर समाजातील उपोषणकर्त्यांना डढ आरक्षणाची अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले 15 नोव्हेंबर रोजी आश्वासनाची मुदत संपत आहे परंतु आजपर्यंत सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही.
यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष, ऍड. जी बी गावडे, बापूराव सोलनकर, सौ.कल्याणी वाघमोडे, गणपत देवकाते, विठ्ठल देवकाते, नवनाथ मलगुंडे इत्यादी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.