अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत उत्तम सुविधांसह बारामती रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील बारामती रेल्वे स्थानकाचा आधुनिक आणि प्रवासी-स्नेही रेल्वे स्थानकात पुनर्विकास करण्यात आला असून, भारतीय रेल्वेच्या दूरदर्शी अमृत भारत स्टेशन योजनेचा भाग म्हणून ते लवकरच राष्ट्राला समर्पित केले जाईल.

₹११.४० कोटींच्या मंजूर खर्चाने या स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे आणि या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध करून देणे, पोहोच सुलभ करणे, स्थानकाची पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि या प्रदेशाचे स्थानिक वैशिष्ट्य जतन करून जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करणे हा आहे. बारामती रेल्वे स्थानकावरून दररोज अंदाजे १,८०० प्रवासी प्रवास करतात आणि दररोज आठ प्रवासी रेल्वे सेवांचे परिचालन केले जाते, ज्यामुळे ते शहर आणि आसपासच्या परिसरासाठी एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून काम करते.

बारामती – इतिहास आणि महत्त्व
बारामती रेल्वे स्थानकाचा इतिहास १९१४ पासूनचा आहे, जेव्हा ते पहिल्यांदा नॅरो-गेज रेल्वे स्थानक म्हणून लोकांसाठी खुले करण्यात आले होते. या प्रदेशाच्या वाढत्या वाहतुकीच्या गरजांमुळे, रेल्वे मार्गाचे नंतर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. ब्रॉडगेज रेल्वे सेवांच्या सुरुवातीमुळे कनेक्टिव्हिटी, परिचालन कार्यक्षमता आणि प्रवाशांची सोय यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली, ज्यामुळे बारामतीचा राज्याच्या रेल्वे नेटवर्कशी असलेला संबंध अधिक दृढ झाला.

बारामती हे महाराष्ट्रातील प्रमुख कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांपैकी एक आहे. हे शहर येथील भरभराटीला आलेल्या सहकारी साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, द्राक्ष लागवड आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी ओळखले जाते. हे शहर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी उद्योगांचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही उदयास आले आहे आणि येथे अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. पूर्व पुणे जिल्ह्याचे एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून, बारामती कृषी, कृषी-आधारित उद्योग आणि उत्पादन क्षेत्राद्वारे या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते, ज्यामुळे प्रवासी वाहतूक आणि आर्थिक विकास या दोन्हींसाठी विश्वसनीय रेल्वे संपर्क अत्यावश्यक ठरते.

या शहराला मोठे सांस्कृतिक आणि पर्यटन महत्त्वही आहे. या प्रदेशाला भेट देणारे पर्यटक जवळच्या भिगवण पक्षी अभयारण्याला भेट देऊ शकतात, जे विशेषतः स्थलांतरित फ्लेमिंगोंसारख्या समृद्ध पक्षी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. इतर प्रमुख आकर्षणांमध्ये ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिर, या प्रदेशाचा कृषी वारसा दर्शवणारे बारामती कृषी पर्यटन केंद्र आणि निसर्गप्रेमी व स्थानिक पर्यटकांना सारखेच आकर्षित करणारा निसर्गरम्य कऱ्हा नदी परिसर यांचा समावेश आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास
वाढती प्रवासी संख्या आणि बारामतीच्या कृषी व औद्योगिक क्षेत्रांच्या स्थिर वाढीमुळे, प्रवाशांच्या सुविधा, सुलभता, वाहतूक आणि एकूणच प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक झाले. या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकाचा सर्वसमावेशक पुनर्विकास करण्यात आला आहे.

प्रमुख कामे पूर्ण

पुनर्विकास प्रकल्पांतर्गत खालील कामे पूर्ण झाली आहेत:

  • अधिक सौंदर्यपूर्ण मुख्य स्थानक इमारतीची सुधारणा
  • प्रवेशद्वाराचे बांधकाम आणि सुधारणा
  • परीसर क्षेत्राचा विकास
  • पार्किंग सुविधांचे आधुनिकीकरण
  • नवीन शौचालयांचे बांधकाम
  • व्हीआयपी लाउंज आणि प्रतीक्षा कक्षाचे आधुनिकीकरण
  • प्लॅटफॉर्म आच्छादनांची तरतूद
  • प्लॅटफॉर्मच्या पृष्ठभागाची सुधारणा
  • आधुनिक स्थानक नामफलकांची स्थापना
  • पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये वाढ
  • दिव्यांग-अनुकूल सुविधांची तरतूद
  • कंपाऊंड भिंत आणि स्थानक प्रवेशद्वाराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

प्रमुख वैशिष्ट्ये
पुनर्विकसित स्थानकात आता खालील सुविधा उपलब्ध आहेत:

  • सुधारित स्थापत्य सौंदर्यासह आधुनिक स्थानक इमारत
  • सुधारित प्रवासी सुविधा
  • सुधारित प्रकाशयोजना आणि प्रमाणित नामफलक
  • प्रवाशांसाठी उत्तम संचार
  • आधुनिक प्रतीक्षा सुविधा
  • सुधारित स्वच्छता सुविधा
  • दिव्यांग प्रवाशांसाठी अडथळामुक्त प्रवेश
  • उत्तम पार्किंग आणि स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग

सांस्कृतिक आणि स्थापत्य वैशिष्ट्ये

  • बारामती स्थानकाच्या पुनर्विकासात स्थानिक संस्कृतीपासून प्रेरित स्थापत्य घटकांचा समावेश आहे.
  • आकर्षक आणि स्वागतार्ह स्थानक वातावरण निर्माण करण्यासाठी आधुनिक डिझाइन तत्त्वांचा प्रादेशिक सौंदर्यशास्त्राशी मेळ घालण्यात आला आहे.

बारामती रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार थेट मुख्य रस्त्याला जोडलेले असल्याने आणि ते राज्य महामार्गांशी उत्तमरीत्या जोडलेले असल्याने येथील दळणवळण व्यवस्था अत्यंत सोयीस्कर आहे. प्रवाशांसाठी ऑटो-रिक्षा आणि इतर स्थानिक वाहतूक सेवांद्वारे प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी सहज उपलब्ध होते, तर खाजगी वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्याने विकसित केलेल्या पार्किंग सुविधांमुळे अधिक सोय निर्माण झाली आहे.

रेल्वे प्रवासाच्या एका नवीन युगाकडे

‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा करण्यात आलेला पुनर्विकास हा देशभरात आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रवासी-स्नेही रेल्वे स्थानके उभारण्याच्या भारतीय रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. अद्ययावत केलेले हे स्थानक प्रवाशांना अधिक आराम, संरक्षा आणि सुविधा प्रदान करेल, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सुलभ प्रवेशाची व्यवस्था सुनिश्चित करेल. उत्तम स्वच्छता, प्रवाशांच्या हालचालीसाठी सुधारित व्यवस्था, कमी झालेली गर्दी आणि अद्ययावत पायाभूत सुविधा यामुळे केवळ प्रवासाचा अनुभवच सुखद होणार नाही, तर बारामतीची निरंतर आर्थिक, कृषी आणि औद्योगिक प्रगतीही साधली जाईल; परिणामी, महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण प्रादेशिक केंद्र म्हणून बारामतीचे स्थान अधिक बळकट होईल.

दिनांक: जुलै १३, २०२६
प्र.प. क्रमांक: २०२६/०७/२७
सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!