इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): उजनी बॅक वॉटर क्षेत्रात पाणी आरक्षित ठेवणेबाबत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत तसेच या परिसरात वीज खंडीत करू नये अशी मागणी व अनेक महत्त्वपूर्ण सूचना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
उजनी धरण कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री.पाटील बोलत होते.
पुढे पाटील म्हणाले की, उजनी बॅकवॉटरसाठी आगामी पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा आरक्षित ठेवल्यास, उजनी बॅक वॉटर वरती इंदापूर शहरासह गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. बॅकवॉटर वरील शेतकर्यांनी जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे.
सध्या उजनी धरणामध्ये आजमितीस 54.35 टक्के म्हणजे 92.80 टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी धरणाच्या 42 वर्षातील इतिहासामध्ये धरण हे 100 टक्के न भरण्याची ही नववी वेळ आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून, काटकसरीने व जपून पाणी वापरावे. उजनी धरण बॅकवॉटरवरती पिण्याच्या पिण्याच्या अनेक नळ पाणी पुरवठा योजनांबरोबर, आगामी काळात उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यासाठी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पाणी आरक्षित ठेवण्यात यावे. या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांना पाणी आरक्षित ठेवणे संदर्भात सकारात्मक सूचना दिल्या. तसेच या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आगामी काळात उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. या मागणी वरही पालकमंत्र्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या.
या बैठकीस आ. बबनदादा शिंदे, आ.संजय शिंदे, आ. सुभाष देशमुख, आ.समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी मान्यवर उपस्थित होते.