इंदापूर(प्रतिनिधी: अशोक घोडके): भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून शिवसेना-भाजप युतीमध्ये आ.अजित पवार यांच्या सह इतरांनी येण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर येथे अर्बन बँकेचे सभागृहात तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा रविवारी संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आ.अजित पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सत्तारूढ सरकार अधिकचे गतिमान होणार आहे. त्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचेही ते म्हणाले.
आगामी सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यातून भाजप-शिवसेना महायुतीचे 45 प्लस खासदार निवडून येऊन नरेंद्रजी मोदी हे सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. तसेच लोकसभा व विधानसभा जागेच्या उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल असेही ते म्हणाले.
इंदापूर तालुक्यातील विकास कामांना शिवसेना-भाजप महायुती सरकारकडून निधीची कामतरता पडू दिली जाणार नाही. इंदापूर तालुका भाजपसाठी आगामी राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी विविध विषयावर चर्चा झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, लाकडी-निंबोडी योजसाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे रु. 295 कोटीची निविदेची प्रक्रिया 15 दिवसापूर्वी पूर्ण झाली आहे. लाकडी-निंबोडी योजना मार्गी लावणे हे भाजपचे प्रमुख ध्येय आहे. तसेच खडकवासला ते लोणी काळभोर पर्यंत खडकवासला कालव्यासाठी आता बोगदा केला जाणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी हे दौंड, इंदापूर तालुक्याला मिळणार आहे. तसेच मुळशी धरणाचे पाणी दौंड, इंदापूर तालुक्याला मिळण्यासाठी शासन स्तरावर अहवाल तयार केला जात असून, त्यामुळे सदरचे पाणीही दौंड, इंदापूर तालुक्याला मिळणार आहे. तालुक्यातील 22 गावांना आपण 7 नंबर फॉर्म वरून पाणी मिळवून दिले आहे. गेली 25-30 वर्षे झाले हे पाणी नियमितपणे शेतकर्यांना मिळत आहे. आगामी काळातही 22 गावांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
इंदापूर शहरात वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभे करणेसाठी आर्किटेक व इतर प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालय व पर्यटन विभागामार्फत सुरू आहे, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,इंदापूर तालुक्यातील निरा नदीवरील सर्व बंधार्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. उजनी जलाशयाच्या प्रदूषणाचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. इंदापूर तालुक्यात अनेक नवीन वीज रोहित्रे मंजूर केली आहेत, ठिकठिकाणी ती बसविण्याचे काम चालू आहे. लोणी देवकरला आपण युती सरकारमध्ये असताना पंचतारांकित एमआयडीसी मंजूर केली. त्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे. आता शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून लोणी देवकर एम.आय.डी.सी. नवीन प्रकल्प आणायचे आहेत. त्यातून आणखी युवकांना रोजगार मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास रु.150 कोटी व निरा भीमा कारखान्यास रु.75 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची रक्कम केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे करण्यात वर्ग करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सदरची रक्कम तातडीने दोन्हीं कारखान्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल. या कामी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे दोन्हीं कारखाने सुस्थितीत येणार आहेत,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका भाजपचे अध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर तर आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.
यावेळी बाबा महाराज खारतोडे यांना तालुका भाजपच्या प्रवक्तेपदी निवडीचे पत्र देण्यात आले. या मेळाव्यास तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, पदाधिकार्यांनी मोठी गर्दी केली होती.