बारामती(वार्ताहर): येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उंडवडी कडेपठार येथील पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात आले.
वन्यजीवांचा विचार करता दरवर्षी प्रमाणे बारामती तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
याप्रसंगी बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, वनसेवक दिलीप काळे, विशाल डेरे आणि फोरम सदस्य उपस्थित होते.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होते. बारामतीनजीक जवळपास सहा हजार हेक्टरवर वनक्षेत्र विस्तारलेले आहे. बारामती नजीकच्या वनक्षेत्रामध्ये चिंकारा, कोल्हे, तरस, लांडगा, खोकड, बिबट्या, ससा, सरपटणारे प्राणी यासह मोठ्या संख्येने पक्षीही आहेत. या सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे दरवर्षी एक आव्हान असते. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून विविध वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्या मुळे वन्यजीवांना काहीसा दिलासा मिळत आहे.
यंदा वनक्षेत्रात आणखी पाच ठिकाणी पाणवठे उभारण्यास फोरमच्या वतीने सहकार्य केले जाणार असल्याचे या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले.