बारामती(वार्ताहर): कोणत्याही काल्पनिक वस्तूवर आपण तोपर्यंत विश्वास ठेऊ शकत नाही जोपर्यंत ती वस्तू आपण प्रत्यक्ष पाहत नाही. अगदी तशाच प्रकारे ईश्वरावर आपला विश्वास तेव्हाच परिपक्व होऊ शकतो जेव्हा ब्रह्मज्ञानाद्वारे आपण त्याला जाणून घेतो. ईश्वरावर दृढ विश्वास ठेऊन जेव्हा मनुष्य आपला जीवनप्रवास भक्तिभावाने युक्त होऊन व्यतीत करतो तेव्हाच तो जीवन प्रवास आनंददायक होतो.
वरील उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल रूपात आयोजित केलेल्या तीन दिवसीय 74व्या वार्षिक निरंकारी सन्त समागमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या सत्संग समारोहामध्ये मानवमात्राला संबोधित करताना व्यक्त केले. संत समागमाचे थेट प्रक्षेपण मिशनची वेबसाईट तसेच साधना टी.व्ही. चॅनलवरुन केले जात आहे ज्याचा लाभ जगभरातील भाविक-भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन घेत आहेत.
सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की एका बाजुला विश्वासावर चर्चा करत असताना दुसर्या बाजुला अंध विश्वासाची बाबही पुढे येते. अंध विश्वासातून भ्रम उत्पन्न होतात, भीती निर्माण होते आणि मनामध्ये अहंकाराचा प्रवेश होतो ज्यामुळे मनामध्ये वाईट विचार येतात; परिणामी कलह-क्लेषांचा सामना करावा लागतो. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू विश्वासावर टिकून आहेत; तथापि विश्वास असा नसावा की वास्तविकता काहीतरी वेगळीच आहे आणि आमच्या मनातील कल्पना काही वेगळीच आहे. डोळे बंद करुन किंवा एखाद्या वास्तविकतेकडे डोळेझाक केल्याने आपण अंधविश्वासाकडे अग्रेसर होतो. एखाद्या कृतीमागील उद्देश जाणून न घेता आणि ती तर्कसंगत नसतानाही केवळ करत जाणे हेच अंधविश्वास किंवा अंधश्रद्धेचे मूळ होय. त्यामुळेच मनामध्ये नकारात्मक भावनांचा प्रभाव वाढू लागतो.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की आजुबाजूचे वातावरण, व्यक्ति किंवा वस्तूंपासून स्वत:ला दूर करने म्हणज भक्ती नव्हे. भक्ति आम्हाला जीवनाच्या वास्तविकतेपासून पलायन करायला शिकवत नाही. उलट जबाबदार्यांचा निर्वाह करत असतानाच क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून आनंदाने जीवन व्यतीत करणे ही खरी भक्ती होय. भक्ति ही कोणाची नक्कल करण्याचे नाव नसून प्रत्येकाचे व्यक्तिगत मार्गक्रमण आहे. नित्यप्रति ईश्वराशी नाते जोडून आपली भक्ती मजबूत करायची आहे. मनामध्ये इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे; परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून निराश होऊ नये. अनासक्त भावनेने आपला विश्वास पक्का ठेवण्यातच आपले भले आहे. असे केल्यानेच मनुष्य खर्या अर्थाने शाश्वत आनंदाची अनुभूती घेऊ शकतो.
दुसर्या दिवशी बोलताना सद्गरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या की, परमात्मा जर सर्वांचा आहे तर मग त्याने रचलेले हे विश्व सुद्धा आपले सर्वांचे आहे. हा परमात्मा सर्वांचा आधार आहे. सर्वांभूती आणि सृष्टीच्या कणाकणामध्ये याचा निवास आहे. अशी भावना जेव्हा मनामध्ये अंकुरित होते तेव्हा अन्य कोणतीही वस्तू अथवा मानवा-मानवामध्ये फरक उरत नाही. मग सर्वांचा विकास हा आपलाच विकास आहे अशी भावना उत्पन्न होते ज्यायोगे अवघा संसार एक परिवार ही भावना धारण केल्याने मानवतेचे उत्थान आणि उन्नती शक्य होते.
जर आपण आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर वास्तविक रूपात सर्वांचा आधार हा परमात्माच आहे ज्याच्यावर विश्वास ठेवणे हा भक्तिचा मूलभूत पाया आहे. म्हणूनच आपुलकीच्या भावनेने आपण एकमेकांशी सद्भावपूर्ण व्यवहार करायला हवा. प्रत्येकाच्या प्रति मनामध्ये सदैव प्रेमाचीच भावना कायम असावी, द्वेषाची नको. जेव्हा आपण कोणासाठी काही करत असून तेव्हाही त्यामध्ये उपकाराची भावना न ठेवता सेवेचाच भाव असावा.
ईश्वरावर विश्वास ठेवण्याची बाब आणखी स्पष्ट करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण या परम सत्तेला ब्रह्मज्ञानाद्वारे जाणून घेतो तेव्हा मग त्याच्यावर विश्वास बसतो आणि खर्या अर्थाने आमची भक्ती सुदृढ होते. त्यानंतर मग जीवनात येणारे विभिन्न् प्रकारचे चढ-उतार आम्हाला विचलीत करू शकत नाहीत. ही दृढता आम्हाला सत्संग, सेवा आणि नामस्मरणाच्या माध्यमातून प्राप्त होते.
या अगोदर सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरु असलेल्या सत्संग समारोहामध्ये देश-विदेशातून भाग घेत असलेल्या वक्ता, गीतकार व कवी सज्जनांनी आपापली व्याख्याने, भक्तीरचना आणि कवितांच्या माध्यमातून समागमाचा मुख्य विषय विश्वास, भक्ति, आनंदयावर प्रकाश टाकला.