अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर(वार्ताहर): राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून घेतलेल्या दिव्यांग नोंदणी शिबीरामुळे इंदापूर तालुक्यातील दिव्यांगाची होणारी हेळसांड थांबणार आहे. या शिबीराचे उद्घाटन ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, सचिन सपकळ, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे, दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष दत्ता बाबर, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, सरचिटणीस सुभाष डरंगे-पवार, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे, डॉ.सुहास शेळके डॉ.माधवी चंदनशिवे, नायब तहसिलदार ठोंबरे, भिगवनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार इ. मान्यवर उपस्थित होते.

अपंग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता अपंग प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचे आयोजन इंदापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गुरुवारी (दि.28 ) करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ना.भरणे यांनी तालुक्यातून आलेल्या अनेक दिव्यांग नागरीकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व येणार्या काळात त्या मार्गी लावू असे सांगून भावनिक आधार दिला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ना.भरणे म्हणाले की, एखाद्या घरामध्ये दिव्यांग व्यक्ती असला तर त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागते हे आपण पाहतो. त्यांची हेळसांड होऊ नये, पुणे मुंबईला जाऊ लागू नये, इंदापुरमध्ये त्यांना प्रमाणपत्र मिळावे याकरिता या शिबिराचे आयोजन केले आहे. पुढे देखील मतिमंद, डोळ्या संदर्भातील आजार तसेच विविध आरोग्याशी निगडीत विविध शिबिरांचे टप्प्याटप्प्याने आयोजन करणार आहोत. दिव्यांग बांधवांना मायेची थाप व आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकार्यांनी आप-आपल्या भागातील अशा व्यक्तींची आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी जेणेकरून दिव्यांगांना मदत करता येईल असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना भरणे की, दिव्यांगाची सेवा करणे हे पुण्याचं काम आहे. काहींना जन्मतः तर काहींना वेगवेगळ्या कारणाने दिव्यांगत्व येत असते. त्यामुळे त्यांना आधार द्या, मदत करा व यांची नोंदणी करा. प्रमाणपत्र काढले नाही तर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. दिव्यांगासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्यांचा लाभ माझ्या तालुक्यातील एक ना एक दिव्यांग बांधवांना झाला पाहिजे, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. लोकप्रतिनिधी व राज्याचा मंत्री या नात्याने जे जे करता येईल ती मदत करीन. अपंगासाठी असणारे यशवंत घरकुल व संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज ताबडतोब भरून घ्या. तुमचे मामा तुमच्या बरोबर आहेतच पण हा ’मामा’ देखील तुमच्या अपंगाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. जेवढी शिबिरांसाठी मदत लागेल ती शासकीय स्तरावरून करेन असेही शेवटी ते म्हणाले.