पुणे(ऑनलाईन वतन की लकीर): रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेला र्निबधांची मुदत 31 ऑगस्टवरून ती 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआयच्या)ने म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत 263.93 कोटींची वसुली केली आहे. तसेच 31 मार्च 2013 मध्ये असलेला 84.37 कोटींचा खर्च 31 मार्च 2021 पर्यंत 48.38 कोटींपर्यंत कमी केला आहे. बँक गेली पाच वर्षे परिचलनात्मक नफ्यात असून पाच वर्षांत 70.82 कोटी रुपये नफा झाला आहे. आरबीआयच्या हार्डशिप योजनेखाली बँकेने 95 हजार 85 गरजू ठेवीदारांना 376.81 कोटी रुपये परत केले आहेत. वसुलीसाठी बँक विविध उपाययोजना करीत आलेली आहे.
बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षणामध्ये तसेच आरबीआयच्या वार्षिक तपासणीमध्ये उणे नक्त मालमत्ता (फार पूर्वीपासून असलेले अपवाद वगळून) कोणतेही गंभीर शेरे नाहीत. आरबीआयला त्यांची वार्षिक तपासणी तातडीने करण्याची विनंती केली असून सप्टेंबरअखेर ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासक, सनदी लेखापाल सुधीर पंडित यांनी दिली.
राज्य शासनाने मंजूर केलेली एकरकमी परतफे योजना काटेकोर राबवण्यात येत असून अंतर्गत आणि वैधानिक तपासणीत कोणतेही दोष आढळलेले नाहीत. बेपत्ता थकबाकीदार, कर्ज चुकवण्याच्या दृष्टीने मालमत्ता वर्ग केल्या असतील, तर बँक त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करत आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 88 खालील चौकशीमधील दोषी संचालक व अधिकार्यांनी केलेल्या अपिलांवरील निर्णय येण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असेही पंडित यांनी सांगितले.