बारामती(वार्ताहर): सागर खलाटेंसह सागर दळवी व सुरेंद्र (बाळू) चव्हाण यांची जबरी मारहाण केल्याच्या खटल्यातून बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 8 जुलै 2007 रोजी बारामती सिनेमा रोडवरील हॉटेल निर्मल भवन समोर सायं. 5.45 च्या सुमारास आरोपी व त्यांचा मित्र श्री.बनकर यांच्या मध्ये पैशाच्या कारणावरून भांडण झाले. त्यात आरोपी यांनी तलवार, वस्तरा आणि काठयांनी मारहाण केल्याचा आरोप होता. फिर्यादी व साक्षीदार श्री.आगवणे यांना नाक, गाल तसेच हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या बाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
खटल्यामध्ये सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले होते. विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार फितूर झाला नाही. भर दिवसा बारामती मधील गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली होती. तसेच यातील फिर्यादी व आरोपी यांचा राजकीय पक्षाशी संबंध असलेमुळे या खटल्याच्या निकालाकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले होते.
सदरची मूळ घटना वेगळीच आहे. त्यामध्ये एकाच आरोपी हजर असलेचा उल्लेख होता. उभयतांमध्ये केवळ शाब्दीक चकमक झाली होती. इतर आरोपींबरोबर या प्रकरणात मुद्दाम गोवले आहे. तशी आरोपी यांनी एक तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. त्याची प्रत आरोपीचे वकील ऍड.विशाल विजयकुमार बर्गे यांनी पुराव्या दरम्यान मे.कोर्टात दाखल केली, त्यानंतर मात्र सदर खटल्यास वेगळेच वळण लागले होते.
फिर्यादी, सगळे साक्षीदार, सगळे पंच हे एकमेकांचे सगळे खास मित्र होते. हे त्यांच्या उलट तपासात सिद्ध झाले. फिर्यादी व जखमी यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीमध्ये घटनास्थळ, हत्यारे, तसेच तिथे हजर असलेले तथाकथित साक्षीदार यांच्या बाबत मोठी तफावत असलेचे आरोपींच्या वकीलांनी सांगितले. तसेच तोंडी पुरावा आणि वैद्यकीय पुरावा याही बाबतीत कसा विरोधाभास आहे हेही शाबीत केले.
अतिशोक्ती पूर्ण फिर्याद दिल्यामुळे तथाकथित हल्ल्याची घटना घडली नसलेबाबत युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे सरकारी पक्षाने दिलेला कोणताच पुरावा विश्वसनीय नसल्याचे मत कोर्टाने नोंदले व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याकामी इतर आरोपी तर्फे ऍड.तौफिक शिकिलकर यांनीही काम पाहिले.