इंदापूर(वार्ताहर): रेडणी (ता.इंदापूर) येथील अन्यायग्रस्त दलित कुटुंबातील प्रफुल्ल तानाजी चव्हाण व सचिन तरंगे यांच्यावर लावण्यात आलेले खोटे दरोड्याचे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी इंदापूरचे तहसिलदार यांना लेखी अर्जाद्वारे कळविले आहे.
यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, पश्र्चिम महाराष्ट्र सोशलचे सहसंयोजक अक्षय गायकवाड, प्रदेश अनु.जाती मोर्चाचे सरचिटणीस सचिन आरडे, साळवेकाका व सचिन मोरे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे अन्यायग्रस्त युवक न्याय मागणेसाठी गेला असता त्यास मंत्र्यांकडून शिवीगाळ होणे आक्षेपाहर्य आहे. राज्यातील दलित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे या युवकाने व दलित समाजाने घाबरून जावू नये असेही दिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर शोभा चव्हाण व सौ.शहाबाई तरंगे या दोघी रेडणीच्या माजी सरपंचाच्या नेतृत्वाखाली अन्य महिलांसमवेत न्यायासाठी उपोषण केले होते. कुटुंबावरील अन्याय दूर व्हावा व सदर अन्यायाची दखल पोलीस व राज्यमंत्री आणि महाविकासआघाडीने घ्यावी हीमागणी करणे त्यांच्या दृष्टीने रास्त आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांकडून मिळालेल्या वागणूकीचा भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध केला आहे.