सन 2020 चा शेवट 31 डिसेंबरला करीत असताना वर्ष सरले.. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील जी मरगळ आहे तीच राहिली आहे. पवार साहेब, दादा व ताईंच्या उच्च विचारावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आजही तरला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. जिथं पिकते तिथं विकत नाही म्हणतात त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात पक्षाचे संघटन ढासाळलेले आहे, एक प्रकारची कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका, शहरातील ज्येष्ठ, युवकांची कार्यकारणीमध्ये बदल करण्याची मागणी होत असताना आजतगायत त्यामध्ये बदल करण्यात आला नाही. हे घोंगडं कित्येक वर्ष भिजत आहे मात्र, दरवर्षी बारामती नगरपरिषदेत स्विकृत सदस्य बदल करून नव्या चेहर्यांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असे पक्षाचे नेत्यांनी जाहीर सभेत सांगितलेले असताना सुद्धा तेही गेल्या 4 वर्षापासून घोंगडं भिजत ठेवलेले आहे. यासर्व गोष्टींवरून कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येणारच, एकनिष्ठेने काम करणारी कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले आहेत. नको त्यावर विश्र्वास देवून पक्षाचा झेंडा पोरखेळपणे काम करणार्यांच्या हाती देवून पक्षाचे संघटन कसे होईल. अशा पोरखेळ पदाधिकार्यांपासून कार्यकर्ते तुटू लागले आहेत. दाखवायचे गाजर आणि हातात द्यायचा मुळा असे कृत्य सुरू आहे.
बारामतीतील तमाम नागरीक पवार कुटुंबियांवर एकनिष्ठेने प्रेम करीत आलेले आहेत. मात्र, विविध संस्थावर दिलेली मंडळी व पक्षाचे पदाधिकारी एकनिष्ठेचे राहिलेले दिसत नाही. ही मंडळी फक्त पद आहे तोपर्यंत म्हणजे पाच वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहतात. त्यानंतर ही मंडळी काय करतात हे सांगण्याची गरज नाही. बारामती हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जरी बालेकिल्ला असला तरी याठिकाणी संघटन नको का? युवक व ज्येष्ठांची सतर्क अशी फळी नको का? पक्षाने एखादा कार्यक्रम, बैठक किंवा तातडीची मिटींग घेतली असता, तेच ती लोकं, कार्यकर्ते व पदाधिकारी येत असतील तर नक्कीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन कौशल्य ढासळलेले असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या त्याच ज्येष्ठाकडून, त्याच युवकाकडून अंगात कोणतीही स्फूर्ती नसल्याप्रमाणे कार्यक्रम लावले जात असतील तर कार्यकर्ते कसे चार्ज होणार हा खरा प्रश्र्न आहे.
सत्ता असो किंवा नसो पक्षाचे संघटन असणे खूप महत्वाचे आहे. बारामतीत मात्र सत्ता असली काय नसली काय जैसे थे काम पक्षाच्या पदाधिकार्यांकडून होत आहे. राज्यात पवार साहेब, दादा व ताईंच्या कार्यामुळे युवक व युवती आकर्षित झाले आहेत. ज्याप्रमाणे गरम लोखंडाला आकार दिला जातो त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उच्च विचार युवक व युवतींसमोर ठेवून त्यांना पक्षात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. सभासद नोंदणी केली पाहिजे. त्याचे प्रश्र्न काय आहेत, त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. युवक व युवतींच्या प्रत्येक गोष्टीसाठी हाकेला धावणारा पक्ष असला पाहिजे तसे होताना दिसत नाही.
आजची पक्षाची व पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या संस्थांची परिस्थिती पाहिली असता, काही संस्थेत दोन गट निर्माण झालेले आहेत. काम कमी सोंगे जास्त अशी अवस्था झालेली आहे. कोण निष्ठावंत, कोण सच्चे हे कामातून नव्हे तर तोंडाने सांगावे लागत आहे. काहींनी पदाची झालर अंगावर ओढून स्वत:चा स्वार्थ साधण्याचे काम करीत आहेत. ज्यांना स्वत:च्या घरात किंमत नाही अशी मंडळी समाजासमोर किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवल्यावर पक्षाचे काम होईल की पक्षाला उतरती कळा लागेल याचा विचार करणे गरजेचे आहे. नेत्यांच्या समोर सुरू असलेल्या बैठकीत बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या म्हणजे तो निष्ठावंत आहे असे समजणे गैर आहे. पक्षाचे काम न करता काही नेत्यांच्या समोर मिरवून आम्ही किती काम करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात व पदांची मागणी करीत असतात. त्यामुळे लवकरच नवीन वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शहर तालुका ज्येष्ठ, युवक, महिला इ. पदांवर नवीन चेहरे देतील व कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करेल ही आशा आहे.