वतन की लकीर (ऑनलाईन): इतरांचे अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही. त्यांना न्याय दिलेला योग्यच आहे पण प्रत्येकाला न्याय तर मराठा समाजावर अन्याय का? असा प्रश्र्न सत्तेत असलेल्यांना राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
मराठा समाजाचे आरक्षण राज्यातील व सध्या सत्तेतील ज्येष्ठ नेते यांनी प्रलंबित ठेवण्यात आले आहे. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात असेही भोसले यांनी सांगितले.
उदयनराजे म्हणाले, मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्यावतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला? मला विचाराल तर फक्त राजकारणासाठी आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. यावर आजवर कुणी खुलासा केलेला नाही, आधीच्या पिढीतील लोकांना आपण मतदान केलं त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे.
जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत बघणार आहात. तुम्ही हा प्रश्न सोडवला नाहीत पण त्याचे उत्तर दिले पाहिजे. उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा कुठल्या तोंडाने त्यांना उत्तर द्याल, शरमेने मान खाली घालावी लागेल. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण अजूनही तेच सत्तेत आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढी वर्षे प्रलंबित का राहिला? त्यावेळी सत्तेत असणार्यांनी प्रश्न का सोडवला नाही? मंडल आयोगाच्यावेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही? मंडल आयोग लागू केला तेव्हा प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आले. पण यावेळी सोयीनुसार मराठा समाजाचा सत्ताधार्यांना विसर पडला. त्यावेळेसच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने याकडे लक्ष का दिले नाही असे प्रश्र्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.