बारामती(वार्ताहर): राज्य शिखर बँकेच्या 25 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट मिळाली आहे. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना क्लीन चीट मिळाली आहे.
क्लीन चीट मिळाल्याने बारामतीत अजितदादा हे रोख-ठोक बोलणारे सच्चे नेते आहेत. भ्रष्टाचार बाहेर काढणारे आहेत भ्रष्टाचार करणारे नाहीत. पवार कुटुंबिय घोटाळे करणारे नसून, घोटाळे काढणारे आहेत. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बोलत आहेत. क्लीन चीटचा आनंद व्यक्त केला जात आहे.
काय होते प्रकरण :-
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. अजित पवार यांच्या अडचणीतही यामुळे वाढ होऊन यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे सुरिंदर अरोरा यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.
आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये 25 हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते. घोटाळ्यावेळी जे मंत्री आणि बँकेचे अधिकारी होते त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली आहेत. अशा एकूण 300 च्यावर मंत्री आणि अधिकार्यांची नावे यात आहेत.
राज्य सहकारी बँकेचे हे नुकसान झाल्याचा होता ठपका :-
संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केले. नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचा कर्जपुरवठा, गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचे कर्ज, केन ऍग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं 119 कोटींचा तोटा, 24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी, 22 कारखान्यांकडील 195 कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित, लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान, कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही 478 कोटींची थकबाकी, खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, 37कोटींचे नुकसान, 8 थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत 6.12 कोटींचा तोटा