मे.कोर्टात ताबा मिळणेचा दावा दाखल असताना, बेकायदेशीरपणे ताबा घेऊन चीजवस्तू चोरून नेले? : फिरोज गुलामअली शेख सह तिघांविरोधात बारामती शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

अडीच महिने उलटूनही शहर पोलीसांची बघ्याची भूमिका : तक्रारदाराचा पोलीसांवर संशय

बारामती(प्रतिनिधी): येथील मे.कोर्टात ताबा मिळणेचा दावा दाखल असताना, पत्रकार फिरोज गुलामअली शेख यांचेसह इतर तिघांनी बेकायदेशीरपणे ताबा घेऊन चीजवस्तू चोरून नेलेबाबतची तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनला 10 ऑगस्ट 2024 रोजी दाखल केली असून, अडीच महिने उलटूनही शहर पोलीसांनी कोणतीही कार्यवाही केली नसलेबाबत तक्रारदार सुरेंद्र शामसुंदर जेवरे यांनी पोलीसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला आहे.

तक्रारदार यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, पाटस रोड, बारामती येथील गोदावरी बिल्डींग तळमजलातील फ्लॅट ही मिळकत तक्रारदाराच्या ताबे वहिवाटीस आहे. या मिळकतीत असणारा वीज जोड सुद्धा तक्रारदार यांचे नावाने आहे. या फ्लॅटमध्ये तक्रारदार यांनी चीजवस्तू ठेवून त्याचा वापर करीत असल्याचे दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे.

तक्रारदार यांनी सदरची मिळकत श्री.सोनार यांचेकडून सन 2005 रोजी रजिस्ट्रर ताबा साठेखताने घेतलेली आहे. तेव्हापासुन सदरची मिळकत तक्रारदाराच्या ताब्यात आहे. गेली काही वर्षापासुन तक्रारदार यांचा वाहन चालक यास राहण्यासाठी दिली होती.

असे सर्व असताना दि.10 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळच्या वेळेस तक्रारदार सदर मिळकतीमध्ये आले असता सदर फ्लॅट मिळकतीचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. याबाबत तक्रारदार यांनी चौकशी केली असता फिरोज गुलामअली शेख व इतर तीन व्यक्ती येऊन अनाधिकाराने प्रवेश केला. या फ्लॅटमधील सामान व कपाटातील तक्रारदार यांना मिळालेल्या भेटवस्तू म्हणून आलेल्या चांदीच्या चीजवस्तू, कपाट, पलंग व इतर वस्तु चोरून नेल्याचे समजले.

फिरोज गुलामअली शेख व इतर तिघांनी मिळकतीचा ताबा मिळावा म्हणून मे.कोर्टात फौजदारी व दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केलेला आहे. या मिळकतीबाबत मे.कोर्टाने कोणतेही आदेश पारीत केलेले नसताना वरील व्यक्तींनी तक्रारदार यांच्या मिळकतीमध्ये अनाधिकाराने प्रवेश करून कुलूप तोडून चीजवस्तु व इतर सामान चोरून नेले प्रकरणी यांची चौकशी करून गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणात अन्य कोणी साथीदार आहेत याचीही चौकशी व्हावी व इतर चिथावणी देणार्‍यांचीही चौकशी व्हावी असेही तक्रारी अर्जात नमूद केले आहे.

सदर तक्रारी अर्ज देवून अडीच महिने उलटूनही शहर पोलीसांनी कोणतीही कार्यवाही/कारवाई केली नाही याबाबत तक्रारदारांचा पोलीसांवर संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे बारामतीकरांचे लक्ष लागून आहे. तक्रारदार यांनी मे.कोर्टात दावा चालू असलेबाबतची सर्व कागदपत्रे जोडून दिली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!