बारामती(प्रतिनिधी): छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी खुप मोठा हातभार लावतात असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांनी केले.
बारामतीत स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात खा.पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जगन्नाथ शेवाळे, सदाशिव सातव, प्रकाश म्हस्के, सतीश खोमणे, एस. एन. जगताप, संदीप गुजर, वनिता बनकर, पौर्णिमा तावरे, सत्यव्रत काळे, ऍड.सुधीर पाटसकर, सुनील सस्ते, संजय सोमाणी, नीलेश कोठारी आदी उपस्थित होते.
पुढे खा.पवार म्हणाले की, बारामतीत छोट्या व्यावसायिकांचीही संख्या अधिक आहे. शहर वाढायचे असेल तर मोठ्यांबरोबर छोटा व्यवसायही वाढला पाहिजे. या छोट्या व्यावयायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घालावे. आम्ही आवश्यक ती मदत करू.
एकेकाळी कापूस, गुळाची बाजारपेठ अशी बारामती ओळख होती. त्यामुळे शेती व व्यापारासाठी बारामती प्रसिद्ध आहे. गुळ उत्पादन येथे होत होते. नंतर साखर कारखाने निघाले. साखर वाढली तशी व्यापारपेठ वाढली. व्यापार समृद्ध झाला. क्रयशक्ती वाढली. बारामतीत व्यापार संघटना अनेक वर्ष काम करते. पण यामध्ये छोट्या लोकांचा विचार नव्हता हे आज लक्षात आले असल्याचेही ते म्हणाले.
खा.सुप्रिया सुळे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदार संघ खुप मोठा आहे. 23 लाख मतदारांची संख्या यामध्ये आहे. आतापर्यंत लोकसभेला 50 ते 60 टक्केच मतदान झाल्याची नोंद आहे. याउलट ग्रामपंचायतीला 90 ते 95 टक्के होते. तिसर्या टप्प्यात आपली निवडणूक आहे. शुभकामाची सुरूवात तुतारी वाजवून होते. भारतीय संस्कृतीत तुतारीला शुभसंदेश मानले जाते. तुतारी फुंकणारा माणुस हेच चिन्ह मलाच का मिळाले यामागे पांडूरंगाची कृपा माझ्यावर आहे मी तिची भक्त आहे. प्रेमाने मागितले असते तर दिले असते मात्र, दमदाटीने इच्छा असेल तरी देणार नाही असेही त्या म्हणाल्या. खरी लढाई अदृश्य शक्तीबरोबर आहे जी महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार राज्य सरकारवर अन्याय करीत आहे. जीएसटी बिल कॉंग्रेसने आणले. 2014 नंतर सत्ता गेल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्या अंमलबजावणीला विरोध आहे. शेतकर्यांना जीएसटी नाही असे म्हणतात मात्र ते खरेदी करीत असलेल्या वस्तुंवर जीएसटी लावला जातो. यामधील जाचक अटींना आमचा विरोध आहे. फॉर्म अचूकच भरला गेला पाहिजे. फेसलेस सर्वात मोठी अडचण आहे. ऑनलाईन त्रास वाढला आहे.
विकास तुमच्यासाठी, तुम्ही विकासासाठी नाही असेही त्या म्हणाल्या. विकासामध्ये व्यापार्यांचा खुप मोठा सहभाग असतो. निवडणूक काळातच गॅस व पेट्रोलचे दर कमी होताना दिसतात, महिला दिनाला का होत नाही. मध्यंतरी बारामतीत महारोजगार मेळावा घेण्यात आला 43 हजार नोकर्या मिळणार म्हणून सांगण्यात आले. या मेळाव्यात 10 हजार नोकर्या मिळाल्या 33 हजार कुठे गेल्या. मिळालेल्या नोकर्या 8 मेपर्यंत टिकतील का, कायम किती होतील हे पहायला मिळणार आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी संजय सोमाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.सुधीर पाटसकर यांनी केले. सुत्रसंचालन सलिम सय्यद यांनी तर शेवटी आभार निलेशभई कोठारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांचे मनोगत….
गेली 40 वर्ष पाडव्या निमित्त ज्या व्यापार्यांना मार्गदर्शन करणार्यांना मेळावा घेण्यास नकार दिल्याने स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना झाली. मेळावा घेताना खुप अडचणींना तोंड द्यावे लागले. महावीर भवनाची पावती फाडण्यापासुन विरोध झाला. माजी नगराध्यक्षांवर ज्याप्रमाणे ऍक्शन घेतली तशी तुमच्यावर घेतली जाईल असे नानाविध प्रकारच्या हस्ते परहस्ते धमक्या देण्यात आल्या.
बारामती व्यापारी महासंघ या संघटनेचा उद्देशाचा विसर काही व्यापार्यांना पडलेला आहे. जागतिक कोव्हीड काळात छोट्या व्यापार्यांना कोणतेही मार्गदर्शन किंवा मदत केली नाही. श्रीमंत बाबुजी नाईक मित्र मंडळातर्फे 10 हजार लोकांना लस उपलब्ध करून चहा नाष्ट्याची सोय केली. शासन व त्यांचे अधिकारी व्यापार्यांना घालीत असलेल्या जाचक अटीतून संरक्षण मिळाले अशी कोणतीही यंत्रणा व्यापारी राबवत नाही.
नागरीक व व्यापार्यांच्या अडचणी सोडविण्याचा मनोमन प्रयत्न केला तर माझ्या विरोधात आर्थिकने मोठा उमेदवार द्यायचा. तरीही जनता मलाच निवडून देत होते. बारामती पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक महिलांच्या प्रकरणात निलंबित झाले व त्यांच्या कठोर कारवाई झाली नाही. देशात ज्याप्रमाणे अंबानी, अदानी यांचे नाव घेतले जाते त्याप्रमाणे बारामतीत हजारो कोटींच्या कामासाठी मोजकेच ठेकेदारांना कामे दिली जातात ती कामे 30 ते 35 टक्याच्या वर निविदा आहेत. यास विरोध केला तर आमदारांकडून दम दिला जातो. दीड हजार कोटींची कामे जास्तीच्या दराने केली जातात. निधीचा दुरोपयोग सुरू आहे. नदीचे सुशोभिकरण केले याचा जनतेला किंवा व्यापार्याला काहीच उपयोग नाही. निरा-डावा कालव्याचे अस्तरीकरण केलेने बोअरवेलला पाणी नाही. अशा सर्व गोष्टींना विरोध करण्यासाठी ताईंसारखे नेतृत्व मिळाले असल्याचेही सस्ते यांनी सांगितले.
विद्या प्रतिष्ठानच्या 700 मी अंतरावर दारूची कंपनी आमदारांनी सुरू केली आहे. मुलगा त्यामध्ये अधिकृत पार्टनर आहे. बारामतीत नगरसेवक होण्याचे असेल तर 30 ते 35 लाखाचा निधी दिल्याशिवाय तो होऊ शकत नाही. आमदार पहाटेच विकासाची पाहणी करून जातात. नागरीक विकासाचा काही भाग नाही का? हा त्यांचा धंदा असुन ठेकेदार जगविण्याचे काम आहे. हेच ठेकेदार विविध संस्थावर सदस्य म्हणून काम करतात. जुनी भाजी मंडई येथील 195 गाळेधारकांचा अजुनही करार केला नाही.
नगरपरिषदेत साहेब, ताई येणार म्हटल्यावर मुख्याधिकारी निघून जात होते तसे आदेश आमदारांचे होते असेही ते म्हणाले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना सह्या करण्या व्यतिरीक्त कोणतेही अधिकार दिले नव्हते. एवढी दडपशाही बारामतीत आहे. या दडपशाही व दबावापोटी चुलत भावाच्या जागेवर तावरेंनी आरक्षण टाकले.
बारामती नगरपरिषदेचे 1800 कोटींचा वार्षिक बजेट आहे हा सर्व पैसा ठेकेदारांना वापरला जातो. कामगारांना बोनस देण्यास यांच्याकडे पैसे नाही. पिंपरी चिंचवडचे भाजपचे नेत्यांनी महानगरपालिकेतील उपभोक्ता कर पूर्णपणे माफ केला. भाजपचा आमदार एवढं करू शकतो तर बारामतीचे आमदार उपमुख्यमंत्री आहेत. याबाबत भेटून सांगितले तरीही सुद्धा उपभोक्ता कर माफ केला नाही. अजित पवारांना त्यांच्याबरोबर असणारी दोन लोकं काहीच करू देत नाही. या सर्व बारामतीच्या राजकारणात ताईंनी लक्ष देण्याची गरज आहे. मी व ऍड.पाटसकर या सर्व गोष्टींसाठी पुरून उरलो आहे.
सौ.सुनेत्रा पवार यांच्या भावी खासदारकीच्या उमेदवारीवर बोलताना ते म्हणाले, यांना लेखी लिहून दिलेले वाचता येत नाही संसदेत काय बोलणार त्यामुळे नागरीकांनी अभ्यासू सुप्रियाताईंना मतदान करावे. आम्ही जरी वेगवेगळ्या विचारधारेचे असलो तरी मनात साहेब व ताईंच आहेत. बारामतीत नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रामाणिक काम केले. पहाटे 5 पासुन रात्री 12 पर्यंत नागरीकांच्या समस्या सोडविण्यात वेळ जातो. जुनी भाजी मंडई येथील गाळेधारकांसाठी गाळ्यांचा कोणताही ठराव नाही. सुशोभिकरणाच्या नावाखाली स्वत:चा ठेकेदार जगला पाहिजे.
प्रत्येक कामात मी बोट दाखविण्याचे काम करतो त्यामुळे मी जी केबल चालवितो त्याच्या एमडीला सुद्धा आमदारांनी दम दिला होता. लोकांची कामे व्हावी म्हणून अधिकार्यांशी भांडून कामे करून घेण्याचा माझा पिंड आहे. अशातच 353 सारख्या गुन्ह्यांशी झुंज द्यावी लागत आहे व देत आहे. इतक्या वर्ष वैभव तावरे यांचा वैभव वाईन्सचा व्यवसाय सुरू आहे मात्र, ताईंचा प्रचार सुरू केला की लगेच दुकान सिल झाले कधीही न घडणारी घटना घडली आहे.
प्रास्ताविक ऍड.सुधीर पाटसकर
आज स्थापन झालेल्या स्वाभिमानी व्यापारी महासंघाचे प्रेरणास्थान खा.शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. ज्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्रांती झाली तसे पालामध्ये राहणारे व्यापारी झालेले आहेत. परंतु काही व्यापार्यांची मानसिकता नव्हती या लोकांना सन्मान प्राप्त करू देवू इच्छित नव्हते. या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रकार केला जात होता. त्यामुळे स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना झाली.
यापुर्वी मोजकीच सोने-चांदीचे, कापडाची दुकाने होती. मात्र, ज्याप्रमाणे बारामतीचा परिसर वाढला तेथील तळागळातील कामगार या धंद्यात आले आणि लाखोची उलाढाल करू लागले. या व्यापार्यांसाठी या महासंघाचे खुले व्यासपीठ केले आहे. पवार साहेबांचा ज्याला परिसस्पर्श झाला त्याचे सोनं झालेले आहे तसेच या व्यापारी महासंघाचे सुद्धा भविष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
सर्व धर्म, जाती, पक्षाचे पदाधिकारी या संघटनेत आहेत. पालापासुन महालापर्यंत सर्वांचा या महासंघाला पाठींबा आहे. हा मेळावा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते. मात्र सर्व बंधनांना जुगारून व्यापार्यांनी जे धैर्य दाखविले आहे ते वाखण्याजोगे आहे.