बोरी गावातील प्रत्येक नागरीक कष्टाळू व मेहनती असल्याने गावाचे नाव महाराष्ट्रात आदराने घेतले जाते – हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): बोरी हे प्रगतशील गाव आहे याचा आम्हाला अभिमान आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे पासून सुमारे 72 वर्षे झाली या गावाशी आमचे ऋणानुबंध आहेत. गावातील शेतकरी, युवक महिलावर्ग कष्टाळू व मेहनती आहेत. त्यामुळे आज बोरीचे नाव महाराष्ट्रात आदराने घेतले जात असल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

बोरी (ता. इंदापूर) गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या गाव चलो अभियानास शनिवारी (दि.10) दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावामध्ये शनिवारी रात्री मुक्काम केला. तर रविवारी (दि.11) सकाळी ग्रामस्थांशी चहापान करीत गाठीभेटी घेत या मुक्कामी अभियानाचा हर्षवर्धन पाटील यांनी समारोप करतेवेळी श्री.पाटील बोलत होते.

पुढे पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात राबविलेल्या मोफत अन्नधान्य योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना आदी असंख्य विकासाभिमुख योजनांमुळे घराघरात समृद्धी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे राज्यात व पुणे जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढत चालला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे देशव्यापी अभियान महाराष्ट्रात सुरु आहे. भाजप हा समाजातील सर्व घटकांना व सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकास करणारा पक्ष आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 51 टक्के मते भाजपला मिळाली पाहिजे, यासाठी इंदापूर तालुक्यातील 327 बुथ वरील भाजपचे कार्यकर्ते केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या अभियानांतर्गत हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावामध्ये ठिकठिकाणी चर्मकार, मुस्लिम, लोहार, ब्राम्हण, मारवाडी, कुंचीकोरवे समाज (केरसुनी व्यवसाय), वडार तसेच घोंगडी विणकर व्यवसायिक, जेष्ठ नागरिक, माहीला, युवक वर्गाची भेट घेऊन चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच द्राक्ष शेती, पॉलिहाऊस यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ.हरिभाऊ वाघमोडे आश्रम शाळेत भेट देऊन तेथे 51 हजार रुपयांची रोख देणगी दिली. तसेच हर्षवर्धन पाटील खंडोबा मंदिर येथे आरती केली. यावेळी पृथ्वीराज जाचक व मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रात्री हर्षवर्धन पाटील यांनी वैभव देवडे या कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (फादर बॉडी) उपाध्यक्षपदी वैभव देवडे व भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाच्या सचिवपदी सनी गवळी या दोघांना नियुक्तीपत्रे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व तालुकाध्यक्ष ऍड.शरद जामदार यांचे हस्ते देण्यात आली. तसेच यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते विनायक ढालपे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या अभियानाच्या दुसरे दिवशी रविवारी (दि.12) सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी काही कार्यकर्त्यांच्या घरी नाष्टा चहापान करीत चर्चा केली. हर्षवर्धन पाटील यांच्या या गाव चलो अभियानामध्ये इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रस्त्यांना निधी म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास नव्हे- हर्षवर्धन पाटील
विद्यालये, कॉलेज, सहकारी संस्था, कृषी प्रक्रिया संस्था काढणे व चालविणे, आरोग्य सेवा, सिंचनाच्या सुविधा, बंधारे बांधणे, वीज केंद्र उभारणे, सामाजिक एकोपा व शांतता ठेवणे, अशाप्रकारे सामाजिक स्वास्थ्य राखणे म्हणजे जनतेचा सर्वांगीण विकास होय, हे काम 20 वर्षे आम्ही केले. मात्र सद्या फक्त रस्त्यांसाठी आलेल्या निधीतून शासकीय निकष न पाळता निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार करणे व शासकीय निधीचा दुरुपयोग करणे म्हणजे विकास नव्हे, असा टोला यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील विरोधकांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!