पुणे(जिमाका): वृक्ष लागवडीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात जनतेचा जास्तीत जास्त सहभाग मिळवून वनांबाबत तसेच वृक्षारोपणाबद्दल स्थानिक जनतेत आवड निर्माण व्हावी आणि वृक्षलागवडीतून पर्यावरणाचा समतोल राखला जावा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय वननीतीनुसारचे, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी वन विभागाकडून लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेऊन नवनवीन योजना तयार करण्यात येतात व या योजना राबविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते.
कृषीप्रधान असणान्या आपल्या भारत देशातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक खेडयात राहतात आणि शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. शेतकर्यांच्या घराजवळ परसदारी उपलब्ध असणारी रिकामी जागा, शेतामधील बांधांवर उपलब्ध असणारी जागा त्याचप्रमाणे शेतकन्यांची खाजगी पडीक जमीन वृक्षलागवडीसाठी उपलब्ध होऊ शकते याचाही या योजनेमध्ये विचार करण्यात आला आहे.
वैश्विक तापमानवाढीचे संकट, त्यामुळे निसर्गामध्ये झालेले मोठे फेरबदल, ऋतूबदलामुळे पावसाचा लहरीपणा, गारपीट/वादळ/अवकाळी पाऊस / ढगफुटी/अतिवृष्टी/महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण इ. कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने समाजातील सर्व घटकांचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग घेऊन जास्तीत जास्त झाडे लावणे अपेक्षित आहे. या सर्व बाबींचा विचार करुन कन्या वन समृध्दी ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली असून, सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला 10 रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे: वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इ. बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे तसेच मुलीच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
त्यानुसार ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणार्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये 5 रोपे सागाची/ सागवान जडया, 2 रोपे आंबा, 1 फणस, 1 जांभूळ आणि 1 चिंच अशी रोपे असतात. भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असतो. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकन्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा आहे. वरील योजना ज्या शेतकन्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त मुली जन्माला येतात व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते त्यांच्याचपुरती मर्यादित असून. 1 मुलगा किंवा 1 मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. मागील 2 वर्षांत 56,900 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजने अंतर्गत 5.69 लक्ष एवढी वृक्ष लागवड झालेली आहे.
या योजनेमध्ये संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊन ती संकलित करून दि. 30 जून पर्यंत संबंधित ग्रामपंचायतींना रोपे उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ज्या शेतकर्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे त्या शेतकर्यांना ग्रामपंचायतीमार्फत 1 जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप करावयाचे आहे.
त्यादृष्टीने वरील योजनेसाठी पात्र ठरणार्या शेतकर्यांनी त्वरीत या योजनेचा लाभ घेण्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज त्वरीत भरुन ग्रामपंचायतीकडे द्यावा व सामाजिक वनीकरण विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. कन्या वन समृध्दी या योजनेसंबंधीचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201806281539 575419 असा आहे (महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय क्र. साववि-2016/प्र.क्र. 165/फ-11, दि.27.06.2018). या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण अथवा आपल्या गावाशी संबंधित सामाजिक वनीकरणाचे कर्मचार्यांशी किंवा ग्रामपंचायतीशी त्वरीत संपर्क साधावा.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय पुणे