बारामती(वार्ताहर): पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियानात बारामती नगरपरिषदेने बक्षिस पटकावे अशी नागरीकांतून मागणी होत आहे.
सदरील अभियान राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि.2 ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या सहा महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये अमृत शहरे 43, नगरपरिषदा 226 तर नगरपंचायती 126 आहेत. या अभियानात पृथ्वी 600 गुण, वायू 100 गुण, जल 400 गुण,अग्नी 100 तर आकाश 300 गुण असे मिळून 1500 गुण ठेवण्यात आलेले आहेत.
पृथ्वीमध्ये-1) हरित अच्छादन आणि जैवविविधता, 2) घनकचरा व्यवस्थापन, वायू-पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांमार्फत परिक्षण करण्यात आलेली वायू गुणवत्ता जल-1) जलसंवर्धन 2) रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन 3) नदी,तळे व नाले यांची स्वच्छता 4) सांडपाणी,मैला व्यवस्थापन व प्रक्रिया, अग्नी- नूतनीकरण योग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरात प्रोत्साहन, एकूण सौरउर्जेवर चालणारे/एलईटडी चालणारे दिले, हरीत इमारतींची संख्या, विद्युत वाहनांना प्रोत्साहन-चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे. आकाश- 1) पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती 2) निसर्ग संवर्धानासाठी नागरीकांनी घेतलेली शपथ
या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मूल्यमापन दि.1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात येईल व याचा निकाल जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे 5 जून 2021 रोजी जाहीर करून बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी – अमृत शहर 3, नगरपरिषदा 3, नगरपंचायती 3 आणि ग्रामपंचायती 3 असे बक्षिस देण्यात येणार आहेत. या अभियानात काम करण्यास प्रोत्साहीत केल्याबाबत विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकार्यांसाठी विभागाचे विभागीय आयुक्त 1, राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हाधिकारी-3 व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 3 यांना सुद्धा गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर उच्चतम कामगिरी करणार्या प्रत्येकी एका नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस व ग्राम पंचायतीस प्रोत्साहनात्मक बक्षिस देण्यात येईल.
काय आहे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश
पृथ्वी :- वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे.
वायू :- हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे.
जल :- नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच, सागरी किनारे यांची स्वच्छता करणे.
अग्नी :- तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध या सारख्या जागांवर राबविणे.
आकाश:- या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे.
