उजनीत बोट बुडाली, सहा जण बेपत्ता पुणे व सोलापूर जिल्ह्यात शोककळा

इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): अवकाळी पाऊसासह वादळी वार्‍यामुळे 21 मेला उजनीत बोट बुडाली सहा जण बेपत्ता झाल्याची मोठी दुर्घटना घडली यामुळे पुणे व सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

या दुर्दैवी घटने संदर्भात युद्ध पातळीवरती मदत व बचाव कार्य सुरू आहे. तसेच एनडीआरएफची तुकडी रात्री उशिरा पर्यंत येणार असल्याचे देखील यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी या मार्गाने बोटीव्दारे प्रवासी वाहतूक केली जाते. मंगळवारी वादळामुळे ही बोट प्रवासादरम्यान भीमा नदीच्या पात्रात बुडाली. एकाने पोहत येऊन आपला जीव वाचवला तर इतर सहा लोक पाण्यात बुडाल्याचे समोर येत आहे.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात कुगावहून कळाशीकडे येणारी बोट (लॉन्च) पाण्यामध्ये पलटी होण्याची घटना मंगळवारी घडली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी व वेदना देणारी आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार दत्तात्रय भरणे यांनी कळाशी गाठली. घटनास्थळी दाखल होत व प्रशासनाशी संपर्क करून त्वरित मदत पोहोच करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती स्वत: आमदार भरणे यांनी दिली.

या संदर्भात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेसह इतर विभागाच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्य करणे संदर्भात माहिती घेऊन सूचना दिल्या असल्याचंही भरणे यांनी सांगितले.

कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस सुरू झाला व जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले व बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्याने दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरणाचा संघर्ष जवळपास दहा ते 15 मिनिटे सुरू होता. मात्र, जोराच्या वादळामुळे त्यांची झूंज अपयशी ठरली व पाणी शिरलेली बोट नदी पात्रात बुडाली.

यावेळी ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला व स्वतःचा जीव वाचविला. हा सर्व थरार त्यांनी कथन केल्याचं भरणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!